उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची आक्रमक शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. अजिंक्य रहाणेने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या. या खेळीदरम्यान अजिंक्य रहाणेने एक विक्रम केला आहे. भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना रहाणेचं हे ९ वं शतक ठरलं. अजिंक्यने यावेळी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना कपिल देव यांनी ८ शतकं झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज - १) मोहम्मद अझरुद्दीन - २० शतकं २) व्हीव्हीएस लक्ष्मण - ११ शतकं ३) सौरव गांगुली/पॉली उम्रीगर - १० शतकं ४) अजिंक्य रहाणे - ९ शतकं ५) कपिल देव - ८ शतकं या कसोटी मालिकेतला दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.