तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेटचं पुनरागमन झालं. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने श्रीलंकेवर १-० ने मात करत मालिकाही जिंकली. कसोटी मालिकेचं सुरक्षितपणे आयोजन केल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर तारे तोडले आहेत.

“पाकिस्तान हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सुरक्षित आहे हे आम्ही सिद्ध केलं आहे. जर कोणी पाकिस्तानात येण्यास उत्सूक नसेल तर त्यांनी आम्हाला सिद्ध करुन दाखवावं. सध्याच्या घडीला भारतापेक्षा पाकिस्तानात क्रिकेट अधिक सुरक्षित आहे.” CAB वरुन भारतात होत असलेल्या हिंसाचाराचा संदर्भ घेऊन मणी यांनी बीसीसीआयला टोला लगावला. पाक क्रिकेट बोर्डाच्या संकेतस्थळाला मुलाखत देताना मणी बोलत होते.

अवश्य वाचा – पाकिस्तानची श्रीलंकेवर मात, कसोटी मालिकाही जिंकली

“पाकिस्तानात कसोटी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून हा महत्वाचा मुद्दा आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्थेवर कोणीही प्रश्नचिन्ह करु शकत नाही”, मणींनी पाक क्रिकेट बोर्डाची बाजू मांडली. श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान बांगलादेशच्या संघाने पाकचा दौरा करावा यासाठी प्रयत्नशील आहे.