Karun Nair Double Century Against England Lions: भारताचा स्टार फलंदाज करुण नायरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे. तब्बल ८ वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर, अखेर आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी तो इंग्लंडमध्ये भारतीय अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरूद्ध अनधिकृत कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात करुण नायरने दमदार दुहेरी शतकी खेळी करत आपलं संघातील स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. करुणने भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या कसोटीत त्रिशतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस आणि आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लक्षवेधी खेळी करून त्याने निवडकर्त्यांना आपली निवड करण्यास भाग पाडलं आहे.

करुण नायर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड लायन्स विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात तो टचमध्ये असल्याचं दिसून आलं. असं एकदाही जाणवलं नाही की, तो ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळताना त्याने २८० चेंडूत २०४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय अ संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.

आठ वर्षांनंतर भारतीय संघात कमबॅक

करुण नायरने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी खेळत असताना शानदार त्रिशतकी खेळी केली होती. यासह तो भारतीय कसोटी संघासाठी त्रिशतकी खेळी करणारा वीरेंद्र सेहवागनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरला होता. मात्र, त्यानंतर त्याला संघातील स्थान गमवावं लागलं होतं. बरेच प्रयत्न केले, पण त्याला संघात स्थान मिळत नव्हतं.

करुण नायरची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत, ” डियर क्रिकेट, मला एक संधी दे..” असं लिहिलं होतं. पण संधी अशाच लोकांना मिळते, ज्यांना काहीतरी साध्य करून दाखवायचं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटककडून खेळणाऱ्या करुण नायरला विदर्भाकडून खेळण्याची ऑफर मिळाली. या संधीचा त्याने दोन्ही हातांनी स्वीकार केला. विदर्भ संघाला एका अनुभवी खेळाडूची गरज होती. ती गरज करुण नायरने पूर्ण केली. या संघाकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफी २०२४–२५ हंगामातील ९ सामन्यांमध्ये ५३.९३ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली. रणजी ट्रॉफीसह विजय हजारे ट्रॉफीतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. आता भारतीय संघात संधी मिळाली आहे. तो कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.