सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग या दिग्गज खेळाडूंचा समावेश असतानाही भारताला गेल्या दौऱ्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. बुधवारपासून नॉटिंगहॅमशायर येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय संघ या पराभवाची परतफेड करणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भूतकाळातील खराब कामगिरी ही इतिहासजमा झाली असून अनुभवी खेळाडूंची जागा आता युवा खेळाडूंनी घेतली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत आत्मविश्वासाने खेळणाऱ्या युवा खेळाडूंवरच भारताची मदार आहे.
भारतापाठोपाठ इंग्लंड संघातही अनेक बदल झाले आहेत. ग्रॅमी स्वान, मॉन्टी पानेसर यांसारख्या प्रभावी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत इंग्लंडला खेळावे लागणार आहे. मोईन अली या फिरकी गोलंदाजाने अपेक्षेइतकी कामगिरी केली नसल्यामुळे इंग्लंडला प्रभावी फिरकी गोलंदाजाची उणीव भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजाची मुख्य मदार स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसनसारख्या वेगवान गोलंदाजांवरच राहणार आहे. फलंदाजीत कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकसह जो रूट, बेन स्टोक्स, इयान बेल, अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन यांच्याकडून इंग्लंडला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
अनुभवी फलंदाज गौतम गंभीर, विराट कोहली, कर्णधार धोनी यांच्याबरोबरच रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय या तरुण खेळाडूंकडून भारताला चांगल्या कामगिरीची आशा आहे. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि हवामान याचा फायदा इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी हे गोलंदाज कसे घेतात, यावरच भारताचे यश अवलंबून आहे.
संघ-
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण आरोन, वृद्धिमान साहा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), सॅम रॉब्सन, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : दुपारी ३.३० पासून.

स्वानच्या अनुपस्थितीत इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत -पीटरसन
नॉटिंगहॅम : ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानच्या अनुपस्थितीत घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडच्या गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे, असे मत माजी कसोटीपटू केव्हिन पीटरसनने व्यक्त केले. ‘‘कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला विविध डावपेच आखताना खूपच संघर्ष करावा लागत आहे. विशेषत: प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर आत्मविश्वासाने फलंदाजी करतात. अशा वेळी त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कुक याच्याकडे प्रभावी अस्त्र नाही व त्याच्याकडे योग्य डावपेचही नसतात. स्वानच्या गोलंदाजीच्या जोरावर अँड्रय़ू स्ट्रॉस याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची कामगिरी चांगली होत होती. स्थिरावलेल्या फलंदाजांना माघारी पाठवण्यात स्वान बऱ्यापैकी यशस्वी ठरला होता. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आता वाळूची मैदाने झाली आहेत. अशा खेळपट्टय़ांचा वेगवान गोलंदाजांना फारसा फायदा होत नाही. किंबहुना भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनाच अशा खेळपट्टय़ा अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.’’ पीटरसनच्या मताशी सहमती दर्शवत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, ‘‘इंग्लंडमधील खेळपट्टय़ा कोरडय़ा असल्यामुळे चेंडू फारसा उसळी घेत नाही. कसोटी सामन्यांमध्ये धावांचा पाऊस झाला तरच प्रेक्षकवर्ग मोठय़ा प्रमाणावर येतो, हे सत्य आहे. मात्र तरीही गोलंदाजांना त्याचा थोडासा फायदा मिळाला, तर सामने अधिक रंगतदार होऊ शकतात.’’