Indian Former Spinner Dilip Doshi Died: भारतीय संघ सध्या क्रिकेट दौऱ्यावर आहे आणि संघाचा पहिला कसोटी सामना हेडिंग्लेमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना अटीतटीच्या वळणावर असताना भारतीय क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचं निधन झालं आहे.
भारताचे माजी डावखुरा फिरकी गोलंदाज असलेले दिलीप दोशी यांचं दु:खद निधन झालं. सोमवारी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ७७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप दोशी यांनी १९७९ ते १९८३ दरम्यान भारतासाठी ३३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीत ११४ आणि एकदिवसीय सामन्यात २२ विकेट घेतल्या.
भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एका मिनिटाचं मौन बाळगत माजी भारतीय दिग्गजला आदरांजली वाहिली. शिवाय दोन्ही संघांचे खेळाडू आज पाचव्या दिवशी हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.
दिलीप दोशी यांनी चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, जिथे त्यांनी पहिल्या डावात १०३ धावा देत ६ विकेट घेतले आणि सामन्यात एकूण ८ विकेट (१६७ धावा देत) घेतले.
दिलीप दोशी हे त्यांच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स (पाच विकेट्स) घेण्याचा पराक्रम करणाऱ्या ९ भारतीय क्रिकेटपटूंच्या मांदियाळीत आहेत. दिलीप दोशी यांनी भारतात सौराष्ट्र आणि बंगाल या संघांकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले होते आणि इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर आणि वॉरविकशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८९८ विकेट्स घेतल्या.
भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आदरांजली वाहिली आहे. तर बीसीसीआयनेदेखील त्यांचा फोटो पोस्ट करत श्रध्दांजली वाहिली.