ग्रॉस आयलेट : अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हानाला धोका निर्माण झाला असून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना आज, सोमवारी होणाऱ्या ‘अव्वल आठ’ फेरीतील अखेरच्या सामन्यात तुल्यबळ भारताविरुद्ध विजय अनिवार्य आहे.

ऑस्ट्रेलियासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आता भारताला नमवण्यासह अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध आपला अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकणार नाही, अशी आशा करावी लागेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील अन्य लढत भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे होणार आहे.

भारताला गेल्या दशकभरापासून ‘आयसीसी’ जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. गेल्याच वर्षी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. आता उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर करण्याची भारताकडे संधी आहे.

हेही वाचा >>> व्हेनेझुएलाची दमदार सलामी; कोपा अमेरिका स्पर्धेत इक्वेडोरला पराभवाचा धक्का

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने साखळी आणि बाद फेरी मिळून अद्याप एकही सामना गमावलेला नाही. ‘अव्वल आठ’ फेरीत अफगाणिस्तान आणि बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने भारताने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. आता ऑस्ट्रेलियाला नमवल्यास भारतीय संघ गट-१ मध्ये अग्रस्थानही मिळवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला सलामीवीरांचीच चिंता

‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय सलामीवीरांच्या कामगिरीकडेच सर्वांचे लक्ष असेल. रोहित आणि कोहली यांना या स्पर्धेत धावांसाठी झगडावे लागले आहे. गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोघांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, रोहित २३ धावा, तर कोहली ३७ धावा करून बाद झाला. आता ऑस्ट्रेलियासारख्या संघाला नमवायचे झाल्यास या दोघांनी अधिक योगदान देणे गरजेचे आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी काही उपयुक्त खेळी केल्या आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या चमकदार कामगिरी करत आहे. रवींद्र जडेजाच्या कामगिरीत सुधारणेला वाव आहे. गोलंदाजीत भारताची मदार पुन्हा जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल.