मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेरीस आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजचे भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. मात्र मधल्या फळीत अजिंक्य रहाणेने सर्वात आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर हनुमा विहारीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात यश मिळवलं. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ६ गडी गमावत २०३ धावांपर्यंत मजल मारली होती. अजिंक्य रहाणेने १६३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. विंडीजकडून पहिल्या दिवशी केमार रोचने ३, गॅब्रिअलने २ तर रोस्टन चेसने १ बळी घेतला. त्याआधी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांना झटपट माघारी धाडण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी विंडीजच्या माऱ्याचा समर्थपणे सामना करत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात ६८ धावांपर्यंत मजल मारली. अवश्य वाचा - Ind vs WI : आश्विनला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर गावसकरांकडून आश्चर्य व्यक्त सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच सामन्यात पुरता अपयशी ठरला. केमार रोचच्या गोलंदाजीवर चेंडू मयांकच्या बॅटडी कड घेऊन यष्टीरक्षक शाई होपच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. पंचांनी विंडीजचं अपिल फेटाळून लावल्यानंतर, कर्णधार जेसन होल्डरने DRS घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांच्या पाहणीत मयांक स्पष्टपणे बाद असल्याचं दिसत होता. यानंतर त्याच षटकात केमार रोचने चेतेश्वर पुजालाही माघारी धाडलं. यानंतर विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅब्रिअलचा उसळता चेंडू खेळताना विराटही माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने पहिलं सत्र खेळून काढत संघाची पडझड थांबवली. दुसऱ्या सत्रात, अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत पहिल्या कसोटीत चहापानापर्यंत आपलं वर्चस्व कायम राखलं. पहिल्या दिवशी दुसऱ्यांदा पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे पंचांनी चहापान लवकर घेण्याचा निर्णय घेतला. चहापानापर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा केल्या. चहापानापर्यंत अजिंक्य रहाणे नाबाद ५० तर हनुमा विहारी १८ धावांवर खेळत होता. उपहारानंतर रोस्टन चेसने लोकेश राहुलला यष्टीरक्षक शाई होपकरवी झेलबाद करत भारताला चौथा धक्का दिला. राहुलने ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज धावसंख्येत किती धावांची भर घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पहिल्या दिवसाअखेरीस ऋषभ पंत नाबाद २० तर रविंद्र जाडेजा नाबाद ३ धावांवर खेळत होता.