दुबई : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा तब्बल १०२१ दिवस म्हणजेच जवळपास तीन वर्षांंपासूनचा शतकदुष्काळ अखेरीस गुरुवारी संपुष्टात आला. आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यात कोहलीची बॅट तळपल्यावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक साकारले.

कव्हर ड्राइव्ह, पूल आणि फ्लिक यांसारख्या फटक्यांचा नजराणा पेश करताना कोहलीने ६१ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्याने नाबाद १२२ धावांची खेळी केली. नोव्हेंबर, २०१९ पासून (बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत १३६ धावा) हे त्याचे पहिले शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने या औपचारिक सामन्यात अफगाणिस्तान संघाचा १०१ धावांनी धुव्वा उडवला. 

यंदाच्या आशिया चषकात भारताचे आव्हान ‘अव्वल चार’ फेरीतच संपुष्टात आले. कोहलीने मात्र या स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या लढतीत ३५, हाँगकाँगविरुद्ध नाबाद ५९, मग पाकिस्तानविरुद्ध ‘अव्वल चार’ फेरीच्या लढतीत ६० धावांची खेळी करताना आपल्याला हळूहळू सूर गवसल्याचे दाखवून दिले होते. श्रीलंकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याला खाते उघडण्यात अपयश आले. मात्र, त्याचा आत्मविश्वास खालावला नाही.   

अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे कोहलीला केएल राहुलच्या साथीने सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. पहिल्या १० चेंडूंत त्याने केवळ १० धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने धावांची गती वाढवली. त्याने ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मग पुढील २१ चेंडूंत त्याने आणखी ५० धावांची भर घालताना ५३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.

या खेळीदरम्यान कोहली पूर्ण लयीत दिसला. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला क्षेत्ररक्षण भेदून चौकार लगावण्यात यश आले. रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब यांसारख्या गुणवत्तापूर्ण फिरकीपटूंविरुद्ध क्रीजबाहेर येऊन त्याने फटकेबाजी केली. तसेच त्याच्यासाठी दुर्मिळ असे स्वीपचे फटकेही त्याने मारले. अखेरच्या चार षटकांत त्याने फझलहक फरुकी आणि फरीद अहमद या डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध सहा चौकार आणि तीन षटकरांची आतषबाजी केली.

कोहलीला सलामीचा साथीदार राहुलची (४१ चेंडूंत ६२) साथ लाभल्याने भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१२ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भुवनेश्वर कुमारच्या ‘िस्वग’ गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानची आघाडीची फळी ढेपाळली. भुवनेश्वरने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचे सलामीवीर हझरतुल्ला झझाई आणि रहमनुल्ला गुरबाझला खातेही न उघडता बाद केले. मग त्याने वैयक्तिक पुढील षटकात आणखी दोन बळी घेतले. यातून अफगाणिस्तानचा संघ सावरू शकला नाही. अफगाणिस्तानला २० षटकांत ८ बाद १११ धावाच करता आल्या.  भुवनेश्वरने चार धावांच्या मोबदल्यातच पाच बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक  भारत : २० षटकांत २ बाद २१२ (विराट कोहली नाबाद १२२, केएल राहुल ६२; फरीद अहमद २/५७) विजयी वि. अफगाणिस्तान : २० षटकांत ८ बाद १११ (इब्राहिम झादरान नाबाद ६४; भुवनेश्वर कुमार ५/४, दीपक हुडा १/३)

सामनावीर : विराट कोहली</p>

अफगाणी चाहत्यांची हुल्लडबाजी

शारजा : आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी झालेल्या ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा अखेरच्या षटकात एक गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या काही चाहत्यांनी शारजा स्टेडियममधील खुच्र्याची मोडतोड करीत पाकिस्तानी चाहत्यांवर हल्ला केला. या घटनेनंतर शारजा पोलिसांनी अफगाणिस्तानच्या काही चाहत्यांना ताब्यात घेतले, पण त्यांना अटक केली नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) या घटनेसंबंधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) निषेध नोंदवला आहे.

आसिफ, फरीदला दंड

या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद यांच्यात मैदानावर वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. आसिफला बाद केल्यानंतर फरीदने त्याच्या जवळ जाऊन जोरात जल्लोष केला. मग आसिफने फरीदवर बॅट उगारली. या घटनेबद्दल दोघांच्याही सामन्याच्या मानधनापैकी २५ टक्के दंड गुरुवारी ठोठावण्यात आला. पहिल्या स्तरावरील आचारसंहितेचे दोघांकडून उल्लंघन झाल्याचा ठपका ‘आयसीसी’कडून ठेवण्यात आला.