भारतीय संघाने आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवल्यास टीम इंडियाला १० लाख डॉलर्सचे घसघशीत बक्षिस मिळणार आहे. भारतीय संघ सध्या अतिश्य चांगल्या फॉर्ममध्ये असून सलग १९ सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. मात्र, येत्या २३ तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाला १० लाख डॉलर्स मिळतील. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल हे आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षिस देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्चस्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी १ एप्रिल २०१७ ची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताने विजय संपादन केला, तर टीम इंडिया सर्वोच्च स्थानी कायम राहून संघाला बक्षिसाच्या रकमेवर दावा करता येईल. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम ५ लाख डॉलर्स इतकी होती. मात्र, २०१५पासून बक्षिसाची रक्कम १० लाख डॉलर्स इतकी करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून याठिकाणी ते चार कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करून टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने न्यूझीलंडला ३-० आणि इंग्लंडला ४-० अशा व्हाईटवॉश दिला होता. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने २०८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये भारतीय संघाने सलग १९ सामने जिंकले आहेत. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गॅले कसोटीनंतर भारताचा एकही पराभव झालेला नाही.
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठीचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील कायम ठेवण्यात आला आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला कांगारुंचे आव्हान फोडून काढावे लागणार आहे. विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे आणि याचा धसका ऑस्ट्रेलियाने देखील घेतला आहे. कोहलीची विकेट घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने योजना आखण्यास देखील सुरूवात केली आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाजांचीही मदत घेतली जात आहे.