India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयात इंग्लंडच्या फलंदाजांनी मोलाचं योगदान दिलं आहे.

इंग्लंडचा दमदार विजय

भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करायचा होता. हे आव्हान स्वीकारून इंग्लंडच्या फलंदाजांनी दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडला जशी सुरूवात हवी होती,तशी सुरुवात जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १८८ धावा जोडल्या. भारतीय गोलंदाजांसमोर ही जोडी फोडण्याचं सर्वात मोठं आव्हान होतं.

पण, या दोघांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवलं. जॅक क्रॉली ६५ धावा करत माघारी परतला. प्रसिद्ध कृष्णाने भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर ओली पोपला बाद करत माघारी धाडलं. इथून भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं होतं. पण त्यानंतर बेन डकेट आणि जो रूटने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. शार्दुल ठाकूरने बेन डकेटला बाद केल्यानंतर पुढच्या चेंडूवर हॅरी ब्रुकला बाद केलं. इथपर्यंत सामना भारतीय संघाच्या हातात होता.

पण स्टोक्स आणि जो रूट अडून राहिले. बेन स्टोक्सने या डावात ३३ धावांची खेळी केली. तर रुटने एक बाजू धरून ठेवली होती. रूटला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण तो शेवटपर्यंत बाद झाला नाही. त्याने जेमी स्मिथसोबत मिळून इंग्लंडला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. जेमी स्थिथ ४४ धावांवर नाबाद राहिला. तर जो रूटनेही नाबाद ५३ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाला १ गडी बाद करता आला.

भारतीय संघाने दिलं ३७१ धावांचं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने ४६५ धावा केल्या. भारतीय संघाला पहिल्या डावात ६ धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ११८ धावांची खेळी केली. यासह ३६४ धावांचा डोंगर उभारला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं.