नवी दिल्ली : याच वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेकरिता संघ पाठवण्यासाठी १ मे ही अंतिम मुदत असून, त्यानंतर संघांना २५ मेपर्यंत आपल्या संघात बदल करता येणार आहे. हेही वाचा >>> IPL 2024 LSG vs PBKS: लखनऊ संघाने मिळवला यंदाच्या हंगामातील पहिला विजय; पदार्पणवीर मयंक यादव ठरला विजयाचा नायक ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ निवडताना ‘आयपीएल’मधील कामगिरी लक्षात घेतली जाणार हे निश्चित आहे. त्यामुळेच ‘आयपीएल’चा पहिला टप्पा पार पडल्यानंतर निवड समिती भारतीय संघ निवडू शकते. स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ निवडायचा असला, तरी सध्याचे चित्र लक्षात घेता भारताचे साधारण १० खेळाडू निश्चित आहेत. अन्य पाच स्थानांसाठी बरीच स्पर्धा आहे. काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर निवड समितीचे बारीक लक्ष आहे. यंदाची स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये असल्यामुळे निवड समिती काही राखीव खेळाडूंची निवड करणे अपेक्षित आहे. प्राथमिक संघातील खेळाडू जायबंदी झाल्यास राखीव खेळाडूंना संधी मिळू शकेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडायचा असल्यामुळे निवड समितीचे चार सदस्य ‘आयपीएल’मधील बहुतेक सामन्यांना उपस्थिती लावत आहेत. ‘आयपीएल’ फ्रेंचायझींना भारतीय खेळाडूंच्या कार्यभार व्यवस्थापनाबाबत कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ‘बीसीसीआय’शी करारबद्ध असलेल्या कोणत्याही खेळाडूला ‘आयपीएल’मध्ये दुखापत झाल्यास त्याचा अहवाल फ्रेंचायझींना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीलाही द्यावा लागतो. ‘‘आयपीएलची साखळी फेरी १९ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघाची पहिली तुकडी न्यूयॉर्कसाठी रवाना होईल. भारतीय संघात निवड झालेल्या ज्या खेळाडूंचे ‘आयपीएल’ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील, त्यांना नंतर अमेरिकेत पाठवले जाईल,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘आयपीएल’चा अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला जाणार असून ट्वेन्टी-२० विश्वचषकाला २ जूनपासून सुरुवात होणार आहे.