कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार ईऑन मॉर्गनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रवीचंद्रन अश्विनसोबत झालेल्या वादाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा दोन महान संघांमध्ये कठीण स्पर्धा असते, तेव्हा या सर्व गोष्टी घडतात, असे मॉर्गन म्हणाला. आयपीएल २०२१मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला, ज्यात कोलकाताने दिल्लीचा ३ गडी राखून पराभव केला.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अश्विन आणि टिम साऊदी यांच्यात बाचाबाची झाली. अश्विनला डावाच्या शेवटच्या षटकात साऊदीने बाद केले. मोठा फटका खेळताना अश्विन झेलबाद झाला. अश्विन साऊदीला काहीतरी म्हणाला आणि चिडला.

अश्विन आणि साऊदी यांच्यातील वाढता वाद पाहून केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गन बचावासाठी आला आणि अश्विनलाही सुनावले. प्रकरण वाढण्याआधीच दिनेश कार्तिकने मध्येच येऊन अश्विनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या विजयानंतर मॉर्गनला या घटनेवर आपली प्रतिक्रिया विचारण्यात आली. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “दोन्ही बाजूंनी ही एक अतिशय कठीण लढत होती. उष्णता जास्त असताना गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात आणि कृतज्ञतापूर्वक असे झाले नाही. आम्ही सर्व चांगल्या खेळभावनेने खेळतो.”

हेही वाचा – “कोचने कोचसारखंच राहावं…” गौतम गंभीर रिकी पाँटिंगवर संतापला

मॉर्गन पुढे म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हा नेहमीच एक अतिशय कठीण सामना असतो. या विजयाचे श्रेय आमचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमला जाते. त्याच्या मानसिकतेमुळेच खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत.” दिल्लीला पराभूत करत कोलकाताने प्लेऑफच्या शर्यतीत जाण्याचा दावा मजबूत केला आहे.