सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाने आयपीएलला जबरदस्त हादरा बसला आहे. ही स्पर्धा होणार की नाही याबाबत संदिग्धता असली तर आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी ही स्पर्धा होणारच असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘‘खेळाडू, बीसीसीआय आणि चाहते यांच्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या साऱ्यांना मी आश्वासन देऊ इच्छितो की आयपीएल बंद होणार नाही आणि या स्पर्धेचा नववा मोसम नियोजनानुसारच होईल,’’ असे शुक्ला म्हणाले.शुक्ला पुढे म्हणाले की, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर नेमके काय करायला हवे, यासाठी बीसीसीआय एका समितीची स्थापना करणार आहे. न्या. लोढा कमिशनचा अहवाल समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यानुसारच आम्ही पुढची पावले उचलणार आहोत. याबाबत मी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. या अहवालाचा अभ्यास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतरच १९ जुलैला याबाबत निकाल घेणार आहोत.’’