आयपीएलच्या आठव्या मोसमात अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला ४१ धावांनी धूळ चारत मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर दुसऱयांदा विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. यंदाच्या मोसमात पहिल्या पाच सामन्यांत निराशा करून गुणतालिकेत रसातळाला घुटमळणाऱया मुंबई इंडियन्सने निर्णायक सामन्यांत जिद्दीने खेळ करत अंतिम फेरी गाठली. अखेरच्या सामन्यात मुंबईने आपल्या स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश केला आणि विजेतेपदावर नाव कोरले. मुंबई इंडियन्सच्या चेन्नई विरुद्धच्या विजयाची कारणे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. क्वालिफायर एकच्या लढतीत चेन्नईवर केलेली मात हीच मुंबई इंडियन्ससाठी खरी निर्णायक घडी होती. क्वालिफायर एकमध्ये चेन्नईवर मिळविलेल्या विजयातून मिळालेला आत्मविश्वास मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यात नक्कीच फायद्याचा ठरला.

२. महेंद्रसिंग धोनीचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय अयोग्य असल्याचे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी सिद्ध करून दाखवले. फॅफ ड्युप्लेसिसच्या अफलातून थ्रोवर पहिल्याच षटकात पार्थिव पटेलचा धावचीत वगळता मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची सुरूवात दमदार झाली. गेल्या काही सामन्यांत दमदार फॉर्मात असलेल्या लेंडल सिमन्सने ४५ चेंडूत ६८ धावा ठोकल्या. लेंडल सिमेन्स यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱया खेळाडूंच्या यादीत तिसऱया स्थानावर आहे.

३. रोहित शर्माच्या ‘क्लिन हिटींग’ फलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. रोहितने केवळ २५ चेंडूत अर्धशतक ठोकून कर्णधारी खेळी साकारली. रोहित आणि सिमन्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर मुंबईला २०० धावांचा टप्पा गाठता आला. विस्फोटक पोलार्डनेही १८ चेंडूत ३६ धावा ठोकून महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर, रायुडूने नाबाद ३६ धावा केल्या.

४. घोटीव यॉर्कर आणि भन्नाट स्विंग गोलंदाजी करणारा आशीष नेहरा या धोनीच्या हुकमी एक्क्याचा रोहित आणि सिमेन्सने यावेळी चांगलाच समाचार घेतला. नेहराच्या चार षटकांत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी ४१ धावा वसूल केल्या. नेहराला या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही.

५. मुंबईने रचलेल्या २०२ धावांच्या भक्कम आव्हानाचा दबाव चेन्नईच्या फलंदाजांच्या चेहऱयावर स्पष्ट जाणवत होता. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात अगदी संथ झाली. हसी अवघ्या ४ धावांवर तंबूत परतल्यानंतर स्मिथ आणि रैनाने धावफलक हलता ठेवला खरा पण, लक्ष्य गाठण्याच्या गरजेनुसार धावा झाल्या नाहीत. अखेर धावांची सरासरी आपल्या नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात ठराविक अंतराने एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. स्मिथ वगळता चेन्नईच्या एकाही खेळाडूला वैयक्तिक ३० धावा देखील करता आल्या नाहीत. आणि अखेरीस मुंबईने चेन्नईला १६१ धावांवर रोखले.

मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five reasons of mumbai indians win
First published on: 25-05-2015 at 01:52 IST