IPL 2020 FINALमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई अंतिम सामना खेळण्याआधी सोशल मीडियावर असा अंदाज व्यक्त केला होता की यंदाचं विजेतेपद अंकशास्त्रानुसार मुंबई इंडियन्सला मिळणं शक्य नाही. मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी चार विजेतेपदं मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या सम अंकाच्या वर्षात विजेतेपद मिळण्याचा प्रश्नच नाही, असा नेटिझन्सकडून अंदाज बांधण्यात येत होता. इतकंच नव्हे तर IPL सुरू होण्याआधी अशीच एक जाहिरातदेखील तयार करण्यात आली होती. त्यात रोहितला हा प्रश्न विचारणाऱ्या मामाजींना रोहितने, “असं म्हणणाऱ्यांचं गणित कच्चं आहे. कारण हे IPLचं १३वं वर्ष आहे म्हणजे विषम संख्या आहे”, असं उत्तर दिलं होतं. त्याच मुद्द्यावर आज रोहितने ट्विट केलं. “आम्ही यंदाच्या वर्षीही जिंकलो. बघा मामू, मी म्हटलं होतं ना यांचं गणित कच्चं आहे”, असं भन्नाट ट्विट त्याने केलं.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 final rohit sharma mumbai indians win hitman funniest tweet bola tha aapko mamu hilarious vjb
First published on: 12-11-2020 at 14:54 IST