रविवारचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला. दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. मुंबईने ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालने गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकाच दिवशी दोन सामन्यांना निकाल सुपरओव्हरवर लागण्याचा आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित राहण्याची आयपीएलच्या इतिहासातली पहिली वेळ ठरली आहे. निर्धारित षटकांत जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. १७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघाने अखेरच्या चेंडूवर हाराकिरी केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पहिल्या डावात पंजाबकडून लोकेश राहुलने ७७ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट यांनी सुरेख मारा करत पंजाबला पहिल्या डावात चांगली झुंज दिली. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ३ तर राहुल चहरने २ बळी घेतले. १७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबने आश्वासक सुरुवात केली. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण आणण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मयांक त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. यानंतर मैदानावर आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांना मैदानावर जम बसतोय असं वाटत असताना गेल राहुल चहरच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर ट्रेंट बोल्टकडे झेल देऊन माघारी परतला, त्याने २४ धावा केल्या. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या निकोलस पूरनला जसप्रीत बुमराहने उसळता चेंडू टाकत आपल्या जाळ्यात अडकवलं. आपले सहकारी एकामागोमाग एक माघारी परतत असताना लोकेश राहुल एक बाजू लावून धरत होता. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत राहुलने आपलं अर्धशतकही झळकावलं. पूरन माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतू लोकेश राहुलने हार न मानता दिपक हुडाच्या साथीने फटकेबाजी सुरु ठेवत पंजाबचं सामन्यातलं आव्हान कायम राखलं. परंतू जसप्रीत बुमराहने १८ व्या षटकात लोकेश राहुलला सुरेख यॉर्कर चेंडूवर त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं. राहुलने ५१ चेंडूत ७७ धावा केल्या. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याआधी, क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या फळीत फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबविरुद्धच्या सामन्यात १७६ धावांचा पल्ला गाठला आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी आज निराशा केली. पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मुंबईचे फलंदाज हतबल ठरले. परंतू डी-कॉक आणि अखेरच्या फळीत पोलार्ड आणि कुल्टर नाईल जोडीने फटकेबाजी करत मुंबईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने संघाला सावध सुरुवात करुन दिली. परंतू रोहित शर्माच्या अपयशाची मालिका पंजाबविरुद्ध सामन्यातही कायम राहिली. अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर रोहित ९ धावांवर त्रिफळाचीत झाला. यानंतर भरवशाचा सूर्यकुमार यादवही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरगन आश्विनकडे झेल देऊन माघारी परतला, सूर्यकुमार एकही धाव करु शकला नाही. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही या सामन्यात निराशा केली. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर आश्विनकडे झेल देत आश्विन माघारी परतला. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी-कॉकने एक बाजू लावून धरली होती. कृणाल पांड्यासोबत डी-कॉकने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत कृणाल आणि डी-कॉकने काही सुरेख फटके लगावले. ही जोडी मैदानावर स्थिरावत आहे असं वाटत असतानाच पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने रवी बिश्नोईला गोलंदाजीची संधी दिली. बिश्नोईनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता कृणालला माघारी धाडलं. त्याने ३४ धावा केल्या. दरम्यानच्या काळात डी-कॉकने आपलं अर्धशतक साजरं केलं. हार्दिक पांड्याही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये धावा जमवण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डी-कॉक ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. १७ व्या षटकांत मुंबईची अवस्था ६ बाद ११९ अशी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्डने आपली जबाबदारी ओळखत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला १७६ धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी २-२ तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.