दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केली आहे. दोन्ही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला. ज्यानंतर सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर लावण्यात आला. मुंबईने सुपरओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त सात धावा केल्या. नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मुंबईचा संघ सुपरओव्हरमध्ये ७ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे RCB ला विजयासाठी ८ धावांचं सोपं आव्हान मिळालं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतू शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, मधल्या फळीत इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली. सलामीवीर फिंच, पडीकल यांची अर्धशतकं आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर RCB ने मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच-पडीकल जोडीने आश्वासक सुरुवात करुन संघाची बाजू भक्कम केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं. परंतू अखेरीस डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे RCB ने आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत डिव्हीलियर्सनेही नाबाद ५५ धावांची खेळी केली. सलामीवीर फिंच आणि पडीकल यांनी बंगळुरुला चांगली सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर RCB चा वरचष्मा निर्माण केला. फिंचने फटकेबाजी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. ट्रेंट बोल्टने फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. फिंच ३५ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर मैदानावर आलेला कर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही. मधल्या षटकांत RCB च्या धावगतीवर अंकुश लावण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. राहुल चहरच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या एबी डिव्हीलियर्सने देवदत पडीकलसोबत फटकेबाजी करुन संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. पडीकलनेही एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ५४ धावांची खेळी केली. यानंतर डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत RCB ला सामन्यात दमदार पुनरागमन करुन दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने एक बळी घेतला.