Rinku Singh Press Conference : आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगने कमाल केली आहे. रिंकू सिंग भारतीय क्रिकेट संघाचा नवीन फिनिशर बनल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. रिंकूने या आयपीएल हंगामात १४ सामन्यांमध्ये ५९.२५ च्या सरासरीनं आणि १४९.५३ च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा कुटल्या आहेत. २५ वर्षीय रिंकूने लखनऊविरुद्धच्या ३३ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी करून यंदाच्या आयपीएलमध्ये चौथं अर्धशतक ठोकलं. रिंकूने धडाकेबाज फलंदाजी करून कोलकाताचा विजय निश्चित केला होता, परंतु, शेवटच्या षटकात एका धावेने लखनऊचा विजय झाल्याने कोलकाताच्या पदरी निराशा पडली. रिंकूने प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी केल्यामुळं टीम इंडियात रिंकू खेळण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत रिंकून माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिंकू माध्यमांशी बोलताना म्हणाला, प्रत्येक खेळाडूप्रमाणे देशासाठी खेळण्याचं माझंही स्वप्न आहे. परंतु, मी यावेळी टीम इंडियाच्या निवडीबाबत विचार करत नाहीय. मी फक्त माझं काम आणि ट्रेनिंग करत आहे. स्वत:ला पुढे नेण्यासाठी मी खेळावर फोकस ठेवण्याबाबत विचार करत आहे. जेव्हा मी घरी जाईल, तेव्हा मी माझं दैनंदिन काम सुरु करेल. जिममध्ये व्यायाम करणं सुरु करेल. मी फक्त माझं काम करत राहील. टीम इंडियात निवड होणे माझ्या हातात नाही. माझ्या हातात जे काही आहे, तेच मी करण्याचा प्रयत्न करेल. मी फक्त माझ्या ट्रेनिंगवर फोकस करत आहे." नक्की वाचा - RCB vs LSG : बंगळुरु आणि लखनऊचा सामना पुन्हा होऊ शकतो का? ‘असं’ आहे समीकरण, जाणून घ्या सविस्तर माहिती रिंकू सिंगबाबत रवी शास्त्री आणि हरभजन सिंगने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले… गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात केकेआरला विजय मिळवून देण्यात रिंकू सिंगचा सिंहाचा वाटा होता. शेवटच्या षटकात पाच चेंडूत पाच षटकार ठोकून रिंकूने कोलकाताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रिंकू सिंग एक जबरदस्त फिनिशर असल्याचं सिद्ध झालं. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिंकूला आगामी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये रिंकूला संधी मिळाली पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. हरभजन सिंगनेही रिंकूला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, असं म्हटलं होतं.