आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला सलामीचा सामना खेळण्याआधी राजस्थान रॉयल्स संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर या तिन्ही प्रमुख खेळाडूंना करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने युएईत क्वारंटाइन कालावधी ६ दिवसांवरुन ३६ तासांवर आणला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे तिन्ही खेळाडू सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत. २२ सप्टेंबरला राजस्थानचा पहिला सामना शारजाच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध रंगणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : डिव्हीलियर्सच्या ‘सुपरमॅन कॅच’ ची विराटकडून नक्कल, RCB ने शेअर केला फोटो
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली मर्यादीत षटकांची मालिका संपवून हे खेळाडू युएईत परतले आहेत. “युएईत दाखल झाल्यानंतर स्मिथ-बटलर आणि आर्चर यांची नियमाप्रमाणे करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. या खेळाडूंसाठीचा क्वारंटाइन कालावधी घटवण्यात आल्यामुळे ते सलामीच्या सामन्यासाठी हजर असणार आहेत.” आयपीएलमधील एका सुत्राने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली आहे.
इंग्लंडविरुद्ध मालिकेदरम्यान सरावादरम्यान स्मिथला दुखापत झाल्यामुळे तो सहभागी होऊ शकला नाही. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापर्यंत त्याची तब्येत न सुधारल्यास जोस बटलरकडे संघाचं कर्णधारपद जाऊ शकतं. त्यामुळे २२ तारखेपर्यंत नेमक्या काय घडामोडी घडतात आणि स्मिथ राजस्थाकडून पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध राहतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.