आयपीएलच्या पंधराव्या हंगामात करोनाने शिरकाव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे मागील हंगामाप्रमाणे याही वर्षी आयपीएलचे उर्वरित सामने तात्पुरते रद्द केले जाणार का ? असे विचारले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयचे आयपीएलच्या आयोजनाचे नवे नियम काय आहेत हे जाणून घेऊयात.

हेही वाचा >>> IPL 2022 : केविन पिटरसनला भारताची भुरळ, IPL मध्ये करणार समालोचन, हिंदीत खास ट्विट करत म्हणाला…

आयपीएलचा पंधरावा हंगामा सुरळीत सुरु असताना मध्येच करोनाचा शिरकाव झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना सुरुवातीला करोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्ली संघाने आपला पुणे प्रवास तात्पुरता रद्द करुन क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या ताफ्यातील सर्वांचीच करोना चाचणी केल्यानंतर आणखी दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एका परदेशी खेळाडूचा आणि एका सपोर्ट टीमच्या सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे आयपीएल क्रिकेट पुन्हा एकदा अर्ध्यातच थांबवावे लागणार का असे विचारले जात आहे. मात्र बीसीसीआयने या संभाव्य परिस्थितीचा अगोदरच अभ्यास केला होता. बीसीसीआयने यावेळी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

हेही वाचा >>> IPL 2022 : दिल्ली कॅपिट्लसच्या ताफ्यात आणखी दोघांना करोनाची लागण, परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह

आयपीएलमध्ये नवे नियम का आहेत ?

नियमानुसार आयपीएल स्पर्धा सुरु असताना एखाद्या खेळाडूला करोनाची लागण झाल्याचे समोर आले तर त्याला सात दिवस विलगीकरणात जावे लागेल. तसेच करोना निगेटिव्ह झाल्यानंतर बायोबबलमध्ये परतायचे असल्यास त्या खेळाडूने २४ तासांच्या अंतराने दोन आरटीपीसीआर चाचण्यांचे निगेटिव्ह रिुपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. जर संघामध्ये अनेकांना करोनाची लागण झाली तर संघ कमीत कमी १२ खेळाडूंना घेऊन संघामध्ये उतरू शकतो. यामध्ये सात भारतीय खेळाडू आणि एक पर्यायी खेळाडू असावा. संघाकडे १२ खेळाडू उपलब्ध नसतील तर सामन्यासंदर्भातील अंतिम निर्णय आयपीएल समिती घेईल.

हेही वाचा >>> IPL 2022 : “ताई, शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर…”; बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेल झाला भावूक

त्यामुळे एखाद्या खेळाडूला करोनाची लगण झाली तर आयपीएल रद्द होण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी सध्या खबरदारी म्हणून दिल्लीचा पूर्ण संघ क्वॉरंन्टाईन झालेला आहे. २० तारखेला दिल्ली कॅपिटल्स संघाचा पंजाब किंग्जशी पुण्यात सामना होणार आहे. मात्र दिल्ली संघाने आपला पुणे प्रवास तात्पुरता रद्द केला असून सर्वच खेळाडूंची करोना चाचणी केली जाणार आहे.