Virat Kohli First Post on RCB Becomes IPL Champion: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरीस १८ वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत ६ धावांनी सामना जिंकला. आरसीबीचा हा विजय पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाले आणि तो मैदानातच ओक्साबोक्शी रडू लागला. १८ वर्षे एकाच आयपीएल संघाकडून खेळणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. ज्याने त्याच्या करियरची सुरूवात, उत्कृष्ट काळ आणि अनेक उतार-चढाव या संघाबरोबर अनुभवले आहेत.
१८ वर्षांनी संघ आयपीएल ट्रॉफी जिंकणार हे २०व्या षटकातील २ चेंडू झाल्यावरच निश्चित झालं होतं. अखेरच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी २९ धावांची गरज होती आणि हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने पहिले २ चेंडू इतके भेदक टाकले की शशांकला एकही धाव घेता आली नाही आणि परिणामी पंजाबच्या हातून सामना निसटल. यानंतर शशांकने पुढच्या चारही चेंडूंवर चौकार-षटकारांची फटकेबाजी केली पण तरीही आरसीबीने ६ धावांनी सामना जिंकत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.
विराट कोहली, संपूर्ण आरसीबी संघ आणि संघाचा मोठा चाहता वर्ग एकच जल्लोषात गढून गेला. ट्रॉफी उचलताच सर्व खेळाडू एकच विजयाचा आनंद साजरा करत होते. आरसीबीचे सर्व आजी माजी खेळाडू या सामन्यासाठी अहमदाबादेत उपस्थित होते. ख्रिस गेल आणि एबी डि व्हिलियर्सही खेळाडूंबरोबर मैदानात विजयाचा आनंद साजरा करत होते.
आऱसीबीच्या या विजयानंतर विराट कोहलीने भावुक होत पहिली पोस्ट शेअऱ केली आहे. ज्यामध्ये मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर फोटोशुट केलेले काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये विराट म्हणाला, “या संघाने ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, हा सीझन मी कधीच विसरणार नाही. आम्ही गेल्या २.५ महिन्याच्या या प्रवासाचा कमालीचा आनंद घेतला आहे. ही ट्रॉफी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या वाईट काळात आमची कधीच साथ सोडली नाही. ही ट्रॉफी इतक्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे.”
“आयपीएल ट्रॉफीबद्दल काय बोलू…, मित्रा ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू १८ वर्षे वाट पाहायला लावली. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे”, असं म्हणत विराट कोहलीने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफी आणि आरसीबीला टॅग करत पूर्ण केलं आहे.
आरसीबीच्या विजयानंतर आज दुपारी 3.30 वाजता बंगळुरूमध्ये विजयी परेड निघणार आहे, याची घोषणा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर पेजवर करण्यात आली आहे. ही विजयी परेड विधान सौधाइथून सुरू होऊन चिन्नास्वामी स्टेडियमवर जाऊन संपेल. याबाबतची अतिरिक्त माहिती पुढील काही वेळात संघाकडून देण्यात येणार आहे.