ग्वाल्हेर : मुंबईकर यशस्वी जैस्वालने आपल्यातील प्रतिभा व गुणवत्ता सिद्ध करताना झळकावलेले द्विशतक आणि त्याला साथ देताना सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने केलेले शतक यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या इराणी चषकाच्या सामन्यात शेष भारताने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३८१ धावांची मजल मारली. ग्वाल्हेर येथे होत असलेल्या या सामन्यात शेष भारताचा कर्णधार मयांक अगरवालच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष होते. परंतु त्याला केवळ २ धावांवर आवेश खानने माघारी पाठवले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यशस्वी (२५९ चेंडूंत २१३ धावा) आणि ईश्वरन (२४० चेंडूंत १५४) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी ३७१ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने आपल्या द्विशतकी खेळीत ३० चौकार आणि ३ षटकारांची, तर ईश्वरनने शतकी खेळीत १७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. ईश्वरनने आपले शतक पूर्ण करण्यासाठी १३५ चेंडू, तर यशस्वीने १५७ चेंडू घेतले. मात्र, यानंतर डावखुऱ्या यशस्वीने धावांची गती वाढवली. यशस्वीने पुढील १०० धावा केवळ ७३ चेंडूंतच फटकावल्या. ऑफ-स्पिनर सारांश जैन (०/१०३) आणि डावखुरा कुमार कार्तिकेय (०/९०) या मध्य प्रदेशच्या फिरकीपटूंना प्रभाव पाडता आला नाही.