पीटीआय, सालालाह (ओमान) : कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत अखेपर्यंत चुरशीने खेळला गेलेला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. अ-गटात समाविष्ट असलेले हे दोनही संघ तीन सामन्यांनंतर अपराजित आहेत.   

या सामन्यात शारदानंद तिवारीने २४व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी नियंत्रित खेळ करत सामन्यावरील पकड निसटू दिली नव्हती. मात्र, ४४व्या मिनिटाला बशरत अलीने पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. या सामन्यातील बरोबरीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोनही संघांचे सात गुण झाले. मात्र, सरस गोलफरकाच्या आधारावर पाकिस्तान अव्वल आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य एका सामन्यात जपानने तैवानचा १०-१ असा पराभव करून गटात तिसरे स्थान मिळवले.

भारतीय खेळाडूंनी सामन्याला आक्रमक सुरुवात केली. चेंडूवर ताबा राखत सातत्याने चाली रचून भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या बचावावरील दडपण वाढवले. सुरुवातीलाच दोन कॉर्नरही भारताने मिळविले. मात्र, त्याचा फायदा भारतीय खेळाडू घेऊ शकले नाहीत. सामन्याच्या मध्यात पाकिस्ताननेही प्रतिआक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यांनाही निर्माण केलेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. भारताचा गोलरक्षक अमनदीपने पाकिस्तानच्या चाली उधळून लावल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वार्धात सामन्याच्या दुसऱ्या सत्रात शारदानंदने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. शारदानंदने कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळविल्यावर भारतीय खेळाडूंच्या खेळात अधिक आत्मविश्वास आला. अनेकदा भारतीयांच्या चालींपुढे पाकिस्तानची बचाव फळी अडचणीत सापडली; परंतु भारतीय खेळाडू आपल्या चालींना अंतिम रूप देऊ शकले नाहीत. उत्तरार्धात बशरतने मैदानी गोल करत पाकिस्तानला बरोबरी करून दिली. १-१ अशा बरोबरीनंतर दोन्ही संघांकडून वेगवान खेळ झाला. गोल करण्यासाठी दोन्ही संघांकडून प्रयत्न झाले; पण एकालाही यश आले नाही. अखेरीस सामना बरोबरीत सुटला. भारताचा अखेरचा साखळी सामना थायलंडशी होणार आहे.