पहिल्या दिवशी तामिळनाडू ६ बाद २४९

डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकरने उपाहारानंतर एकामागून एक तीन धक्के दिल्याने तामिळनाडूची बिकट अवस्था झाली होती. पण दिनेश कार्तिकने नाबाद अर्धशतकी खेळी साकारत संघाला सावरले. बाबा अपराजित आणि कार्तिकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावरच तामिळनाडूला मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ६ बाद २४९ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
नाणेफेक जिंकत मुंबईने तामिळनाडूला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुरली विजयला (८) वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने स्वस्तात बाद करीत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर बाबा अपराजितने मुंबईच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. या खेळीतील सातवा चौकार लगावत त्याने अर्धशतक झळकावले. उपाहाराला जाताना त्याने अर्धशतकाच्या जोरावर संघाला शतकाची वेसण ओलांडून दिली होती, पण उपाहारानंतरच्या खेळाने सामन्याला कलाटणी दिली. विशालने उपाहारानंतरच्याच ३५ व्या षटकात कौशिक गांधीला (३१) बाद करीत स्थिरस्थावर झालेली जोडी फोडली. त्यानंतर ३९ व्या षटकात बाबा अपराजित (६२) आणि बाबा इंदरजित (०) या भावांना बाद करीत मुंबईला मोठे यश मिळवू दिले. आता मुंबई वरचढ होणार असे वाटत असतानाच कार्तिक त्यांच्यासाठी धावून आला. कार्तिकने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७६ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : ९० षटकांत ६ बाद २४९ ( दिनेश कार्तिक नाबाद ७६, बाबा अपराजित ६२; विशाल दाभोळकर ४/६७)