भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी सामन्यांवर आहे. भारतीय क्रिकेटमधील एका नव्या युगाला आता सुरूवात होणार आहे. नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली नवा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर, करुण नायरा इंग्लंड दौऱ्यावर ७ वर्षांनी भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे. भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी करुण नायरने एक मोठा खुलासा केला आहे.
करूण नायरने सामन्यापूर्वी बोलताना सांगितलं की, एका मोठ्या भारतीय क्रिकेटपटूने त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. पण करूण नायरने सातत्याने भारतीय संघासाठी पुन्हा खेळण्याची आपली जिद्द कायम ठेवली आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा भारताच्या कसोटी संघात आपले स्थान तयार केले.
२०२२ च्या देशांतर्गत हंगामानंतर कर्नाटकने नायरला सर्व फॉरमॅटमधून वगळले होते. करूणने जवळजवळ १४ महिने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळले नव्हते आणि त्यानंतर नॉर्थम्प्टनशायरसह त्याने काउंटी चॅम्पियनशिप करारासह क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. नायरने सांगितलं की यादरम्यान एका प्रमुख भारतीय क्रिकेटपटूने त्याला सल्ला दिला की टी-२० लीगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्यास त्याला आर्थिक सुरक्षितता मिळेल.
डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत नायर म्हणाले, “मला अजूनही आठवतंय की एका मोठ्या भारतीय खेळाडूने मला फोन करून म्हटलं होतं की तू निवृत्ती घेतली पाहिजे कारण या लीगमधून मिळणारे पैसे तुझं भविष्य सुरक्षित ठेवतील. हा निर्णय घेणं सोपं असत, पण मला माहित होते की कितीही पैसे असले तरी, इतक्या सहजपणे हार मानली असती तर मी मलाच दोष राहिलो असतो.
मी पुन्हा भारतासाठी खेळण्याचा प्रयत्न करणं कधीचं सोडणार नव्हतो. ही दोन वर्षांपूर्वीची घटना आहे आणि आता पाहा आम्ही कुठे आहोत. हा वेडेपणा आहे पण मला माहितीये मी यासाठी पात्र आहे, असं करूण नायरने शेवटी म्हटलं.
नुकत्याच कॅन्टरबरी येथे झालेल्या इंग्लंड लायन्स विरुद्धच्या भारत अ च्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावलं. याशिवाय त्याने दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या कामगिरीसह नायरने भारतीय कसोटी संघाच्या प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळवण्याचा आपला दावा पुन्हा एकदा बळकट केला आहे. नायरने लायन्स विरुद्धचे द्विशतक या वर्षीचे त्याचे ५ वे प्रथम श्रेणी शतक होते.