भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी स्पर्धा वाढलेली असताना, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात जागा दिली आहे. यावेळी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी श्रेयस उत्सुक असून, मी कोणत्याही जागेवर फलंदाजी करण्यासाठी तयार असल्याचं श्रेयसने म्हणलंय. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली होती. या मालिकेत श्रेयस अय्यरने शतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. याचसोबत गेल्या २ हंगामातील आयपीएल सामन्यांमधली श्रेयस अय्यरची कामगिरी पाहता निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत त्याला संघात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातला अनुभव एक फलंदाज म्हणून मला खूप कामाला येतोय. याआधीही मी चांगली कामगिरी करत होतो, मात्र या चांगल्या खेळीचं शतकात रुपांतर करणं मला जमतं नव्हतं. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मी नेटाने फलंदाजी करत शतक ठोकल्याचं श्रेयस म्हणाला. पहिल्या टी-२० सामन्याआधी श्रेयसने नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघात जागा मिळाल्यास आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार असल्याचं श्रेयसने म्हणलंय. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना मला प्रत्येक १ ते ३ क्रमांकावर खेळण्याचा अनुभव मिळाला आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या ठरत नसल्याचंही श्रेयसने स्पष्ट केलंय. संधी मिळाल्यास आपण १०० टक्के कामगिरी करुन संघात आपलं स्थान बळकट करु, असंही श्रेयस म्हणाला. त्यामुळे या सामन्यात श्रेयस अय्यरला संघात जागा मिळते का हे पहावं लागणार आहे.