सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोक्योहून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सोमवारी नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेलं बॅनरवरुन आता सोशल नेटवर्किंगवर दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे या बॅनरचं समर्थन करणाऱ्यांचाही समावेश आहे. २०१२ साली ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तने मोदींचा असा फोटो लावण्यात काहीच गैर नसल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याने या फोटोवरुन मोदींवर टीका करणाऱ्यांना पंतप्रधानांबद्दल अशी भावना ठेवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मेडल मोदीजींनी आणलंय का?; मंचावरील बॅनर पाहून ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सरनेही व्यक्त केली नाराजी

झालं असं की पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी नवी दिल्लीमधील हॉटेल अशोकामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनाही आपली मत व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचेच लक्ष वेधले. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो होते. मात्र हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या आकारापेक्षा फारच छोटे असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. एका पत्रकारानेही मंचावरील बॅनरचा फोटो पोस्ट करत मोदींवर टीका केली. “भारतात पोहचल्यानंतर ऑलिम्पिक विजेत्यांचा सत्कार अशाप्रकारे झाला,” या ओळीसहीत पत्रकाराने हा फोटो पोस्ट केला. हाच फोटो कोट करुन रिट्विट करत योगेश्वर दत्तने टीकाकारांना सुनावलं आहे. “देशाचे माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अशी भावना मनात ठेवणे हे हलक्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. खेळाडूंच्या सन्मानाच्या वेळी प्रत्येक सरकार विजेत्यांसोबत फोटो लावतात. सरकारने खेळाडूंच्या स्वागतासाठी आणि सन्मानासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. सरकार हे करण्यासाठी आग्रही आणि कटीबद्ध असल्याने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं,” असं योगेश्वरनं म्हटलं आहे

मात्र दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.

काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे.

बी. व्ही. यांनी अन्य एका ट्विटमध्ये “खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत.. न पहले कभी देखी है न सुनी है..”, अशा ओळींसहीत या कार्यक्रमामधील मंचाचा फोटो शेअर केलाय ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरुनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेने लहान आकाराचे आहेत.

सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी हे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली असून खेळाडूंचे फोटो अजून मोठ्या आकाराचे आणि अधिक प्राधान्यक्रमाने ठेवायला हवे होते असं मत नोंदवलं आहे. दरम्यान, विजेंदर सिंगने मोदी सरकारवर अशाप्रकारे टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता तेव्हाही विजेंदरने मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विटरवरुन लगावला होता.