Pakistan cricket team has arrived in India: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ बुधवारी भारतात पोहोचला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही, परंतु दोन्ही संघ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा २०१६ मध्ये केला होता. यानंतर म्हणजेच सात वर्षानंतर ही टीम भारतात आली आहे.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ ७ वर्षांनी भारतात दाखल –

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात पोहोचला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली हा संघ ७ वर्षांनंतर भारतीय भूमीवर एक स्पर्धा खेळणार आहे. पाकिस्तानचा संघ थेट हैदराबादला पोहोचला जिथे त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. यानंतर पाकिस्तानला ३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे.

२०१६ मध्ये पाकिस्तानने शेवटचा केला होता भारत दौरा –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होण्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघ २०१६ मध्ये भारतात आला होता आणि या वर्षी टी-२० विश्वचषक खेळला गेला. पाकिस्तान संघाला गट २ मध्ये स्थान देण्यात आले असून या संघाशिवाय न्यूझीलंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे संघ होते. पाकिस्तानने एकूण ४ सामने खेळले, त्यापैकी एक सामना जिंकला आणि ३ सामने गमावले होते. पाकिस्तान संघाला एकूण २ गुण मिळाले आणि ते गटात चौथ्या स्थानावर राहिले आणि त्यांना पुढे प्रगती करता आली नाही.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस, मोडला रिकी पाँटिंग आणि व्हिव्ह रिचर्ड्सचा विक्रम

पाकिस्तानने शेवटचा वनडे विश्वचषक २०११ मध्ये भारतात खेळला होता –

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, याआधी २०११ मध्ये पाकिस्तानचा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला होता. या विश्वचषकात पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता, जिथे मोहालीत भारताचा सामना झाला होता आणि या संघाला २९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली भारतात आला असून हा संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वविजेता बनण्याचा प्रयत्न करेल. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली १९९१ मध्ये पाकिस्तानने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात भारताचा पाकिस्तानशी सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.