ब्रिस्बेन- अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३९ धावांनी पराभव झाला. एकाच सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. असद शफीकचे शतक आणि त्याला मिळालेली यासीर शाहची साथ या जोरावर पाकिस्तान विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आला होता. परंतु, यासीर विकेट पडली आणि सर्व खेळाची बाजीच पलटली.

एकवेळ पाकिस्तानची स्थिती ६७ वर आठ अशी होती. यासीर आणि शफीकच्या खेळानंतर ही स्थिती ४२३ वर आठ झाली. यासीर धावबाद झाला आणि पाकिस्तान एका ऐतिहासिक विजयाला मुकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२९ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरार पाकिस्तानला केवळ १४२ धावा काढता आल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०२ धावा करुन आपला खेळ घोषित केला.

पाकिस्तानने जेव्हा खेळाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर ४९० धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानचा आधीचा खेळ पाहता हे लक्ष्य डोंगराएवढे मोठे वाटू लागले होते.

चौथा दिवस संपत आला तेव्हा पाकिस्तानला १०८ धावांची गरज होती आणि हातात केवळ २ विकेट्स होत्या. जसा पाचवा दिवस जवळ येऊ लागला होता तेव्हा पाकिस्तान हा सर्वार्थाने मोठ्या विजयाच्या जवळ आला परंतु पाचव्या दिवशी १३७ धावांवर खेळत असताना असद शफीक मिशेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यावेळी पाकिस्तानची स्थिती ४४९ वर ९ अशी झाली.

त्यानंतर यासीर शाह धावबाद झाला आणि पाकिस्तान ३९ धावांनी पराभूत झाला.
पाकस्तानने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा खेळ केलेला माझ्या पाहण्यात नाही. खेळाचा निकाल काहीही असो परंतु पाकिस्तानने कडवी झुंज दिली यात काही शंका नाही असे ट्विट पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने केले.