क्रिकेटचा सामन्यात अनेकदा व्यत्यय आलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत तर चक्क मैदानात साप शिरल्यामुळे सामना थांबवावा लागला होता. २०१९-२० रणजी हंगामाचे बाद फेरीचे सामने सध्या सुरु आहेत. ओंगल येथे सौराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश हा सामना सुरु आहे. या सामन्यात खेळ सुरु असताना मैदानात गाय शिरल्यामुळे काहीकाळासाठी सामना थांबवाला लागला.

तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, CSR Sharma कॉलेजच्या मैदानावर चक्क गाय शिरली. गाय थेट खेळपट्टीपर्यंत धावत गेल्यामुळे तिला थांबवण्यासाठी मैदान कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झालेली पहायला मिळाली. या सर्व प्रकारामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.

दरम्यान या सामन्यात सौराष्ट्राने आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे. पहिल्या डावात ४१९ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, आंध्र प्रदेशचा पहिला डाव अवघ्या १३६ धावांत संपुष्टात आला. सध्या सौराष्ट्राकडे ३५० पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे.