महाराष्ट्राच्या पहिल्या डावात ४४६ धावा; तमिळनाडू दिवसअखेर ४ बाद २६७

Ranji Trophy Cricket Tournament महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यातील रणजी करंडक लढतीत पहिल्या डावातील आघाडीसाठी दोन्ही संघांना समान संधी असल्याचे चित्र दुसऱ्या दिवसअखेरीस होते. महाराष्ट्राचा पहिला डाव ४४६ धावांत संपुष्टात आल्यावर तमिळनाडूने दिवसअखेर ४ बाद २६७ धावांची मजल मारली. ते अजून १७९ धावांनी पिछाडीवर आहेत. महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे (१९५ धावा) द्विशतक हुकले.

दुसऱ्या दिवशी बुधवारी महाराष्ट्राचा डाव फार लांबू शकला नाही. पहिल्या दिवसअखेरच्या धावसंख्येत महाराष्ट्राच्या उर्वरित फलंदाजांना आणखी ९६ धावांचीच भर घालता आली.ऋतुराज आणि अझिम काझी जोडीने सातव्या गडय़ासाठी १६४ धावांची भागीदारी रचली. काझीला (८८) बाद करत संदीप वॉरियरने ही जोडी फोडली. त्यानंतर महाराष्ट्राचे फलंदाज ऋतुराजला फारशी साथ देऊ शकले नाही. द्विशतकाच्या उंबरठय़ावर ऋतुराज बाद झाला. त्याने १९५ धावांच्या खेळीत १८४ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि ८ षटकार लगावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या डावाला प्रत्युत्तर देताना तमिळनाडूने चौथ्याच चेंडूवर पहिला फलंदाज गमावला. त्यानंतर मात्र तमिळनाडूच्या प्रत्येक फलंदाजाने जबाबदारीने खेळ केला. नारायण जगदीशन (७७) आणि प्रदोष रंजन पॉल (नाबाद ७४) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. कर्णधार बाबा इंद्रजितनेही (४७) चांगले योगदान दिले. जगदीशन आणि इंद्रजित यांच्यातील ९४ धावांची भागीदारी तमिळनाडूचा डाव सावरणारी ठरली. हे दोघे बाद झाल्यावर प्रदोश आणि विजय शंकरने (नाबाद ४१) संयमाने खेळ केला.