भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. पण या मालिकेसह, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आतापर्यंत दिलेली ‘पतौडी ट्रॉफी’ निवृत्त करण्याचा आणि या मालिकेचे नाव ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि टीका झाली. यादरम्यान सचिन तेंडुलकरने एक मोठं पाऊल उचललं आहे.
भारत-इंग्लंड मालिकेचं नावावर सुरू असलेल्या गोंधळादरम्यान एक अपडेट समोर येत आहे, की या मालिकेचं पतौडी कनेक्शन कायम असणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि स्वतः सचिन तेंडुलकर यांच्या विनंतीनंतर ईसीबीने हा निर्णय घेतला आहे. आता विजेत्या संघाच्या कर्णधाराला पतौडीच्या नावाने पदक दिले जाईल.
क्रीकबजच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि ईसीबी अधिकाऱ्यांना निश्चितच ‘पतौडी’ हे नाव भारत आणि इंग्लंड मालिकेशी जोडले जावे अशी इच्छा होती. परंतु त्याच वेळी, ते सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांना त्यांच्या नावाने मालिकेचे नाव देऊन त्यांचा सन्मान करू इच्छित होते. पण आता सचिन तेंडुलकरने पुढाकार घेत दोन्ही बोर्डांशी संपर्क साधला आहे आणि नाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिन तेंडुलकरने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने ईसीबी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपले मत बदलण्याची विनंती केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की मास्टर ब्लास्टरने बीसीसीआय आणि ईसीबी अधिकाऱ्यांशी पतौडी वारसा कायम चालू ठेवण्याबाबत चर्चा केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत पतौडीचे नाव कायम राहावे यासाठी आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. “हो, इंग्लंड-भारत मालिकेत पतौडी कनेक्शन कायम ठेवण्याची निश्चित योजना आहे,” असे क्रिकबझने ईसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. पतौडी यांच्या नावाने एक खास पदक ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. हे पदक मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार आहे.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण होणार होते. परंतु, अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेमध्ये २४१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.भारत वि. इंग्लंड यांच्यात २० जूनपासू ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. सचिन तेंडुलकरच्या विनंतीनंतर आता दोन्ही क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.