काठमांडू : गुरकिराट सिंगने साकारलेल्या दोन गोलच्या बळावर भारताने बुधवारी श्रीलंकेला ३-० असे नामोहरम करीत ‘सॅफ’ १८ वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

भारताच्या अखेरच्या साखळी सामन्यात गुरकिराटचे दोन गोल आणि अमन छेत्रीचा एक गोल महत्त्वाचा ठरला. भारताने आक्रमक पद्धतीने सामन्याला सुरुवात केली. पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या बचावाने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे मध्यंतराला गोलफलकावर गोलशून्य बरोबरी होती.

मग दुसऱ्या सत्रात गुरकिराटने ६५व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर गुरकिराट आणि अमन यांनी आणखी एक करीत आघाडी तीनपर्यंत वाढवली. त्यानंतर श्रीलंकेने डोके वर काढले नाही. भारताने सलामीच्या सामन्यात बांगलादेशला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.