अत्यंत असमान उसळी आणि फिरकी मिळणाऱ्या इडन गार्डन्सच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने अडीच दिवसात यजमान भारतीय संघाला ३१ धावांनी नमवलं. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने साकारलेलं अर्धशतक पाहुण्यांच्या विजयाचा मानबिंदू ठरला. तब्बल १५ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी विजय मिळवला आहे. विजयासाठी मिळालेल्या १२४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ९३ धावांतच आटोपला. सिमोन हार्मेरने ४ तर मार्को यान्सन आणि केशव महाराजने प्रत्येकी २ विकेट्स घेत हार्मेरला तोलामोलाची साथ दिली. तेंबा बावूमासाठी कर्णधार म्हणून खेळताना ११ कसोटीत हा दहावा विजय आहे.

१२४ धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना मार्को यान्सनच्या फसव्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. यान्सनच्या उसळत्या चेंडूचा राहुलला अंदाज आला नाही. ध्रुव जुरेलने चांगली सुरुवात केली. जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर भागीदाराने आशा पल्लवित केल्या. स्थिरावलेला असताना जुरेलने कार्बिन बॉशच्या हातात झेल दिला. ऋषभ पंतकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो २ धावा करून तंबूत परतला. जडेजाने सुंदरला साथ दिली. पण हार्मेरने त्याला पायचीत केलं. एडन मारक्रमने सुंदरची खेळी संपुष्टात आणली. त्याने ९२ चेंडूत ३१ धावा केल्या. कुलदीप यादवही झटपट तंबूत परतला. सहकारी बाद होत असल्यामुळे अक्षर पटेलने केशव महाराजविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने चौकार, षटकार वसूल केला. मात्र त्याच षटकात आणखी एक मोठा फटका खेळायचा त्याचा प्रयत्न तेंबा बावूमाच्या हातात जाऊन विसावला. अक्षरने २६ धावा केल्या. महाराजने सिराजला बाद केलं आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कर्णधार शुबमन गिल फलंदाजीला येऊ शकला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या दक्षिण आफ्रिकेने साजेसा खेळ करत यजमानांना चीतपट करण्याची किमया साधली.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कागिसो रबाडा दुखापतग्रस्त झाल्याने कार्बिन बॉशला अंतिम अकरात संधी मिळाली. भारतीय संघाने कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा अशा चार फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. ५५व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांतच गुंडाळला. ९ फलंदाज संघात असूनही दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर एडन मारक्रमची ३१ धावांची खेळी सर्वाधिक ठरली. बुमराहने १४ षटकात २७ धावांच्या मोबदल्यात रायन रिकलटन, एडन मारक्रम, टोनी द झोरी, सिमोन हार्मेर आणि केशव महाराज अशा पाचजणांना तंबूत धाडलं. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसअखेर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या.

के.एल.राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण केशव महाराजने राहुलला तर सिमोन हार्मेरने सुंदरला बाद केलं. राहुलने ३९ तर सुंदरने २९ धावांची खेळी केली. मानेच्या दुखापतीमुळे शुबमन गिल रिटायर्ड हर्ट होऊन परतला. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध ऋषभ पंतने नेहमीच्या इराद्याने खेळायला सुरुवात केली. मात्र कार्बिन बॉशच्या उसळत्या चेंडूवर तो फसला. त्याने २७ धावा केल्या. रवींद्र जडेजाने २७ धावांची खेळी करत प्रतिकार केला. पण दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारतीय संघाने नांगी टाकली. भारताचा डाव १८९ धावात आटोपला. भारतीय संघाला अल्प आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकातर्फे हार्मेरने ४ तर मार्को यान्सनने ३ विकेट्स पटकावल्या.

दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरूच राहिली. पण कर्णधार तेंबा बावूमाने खेळपट्टीचा नूर ओळखत नांगर टाकला. एका बाजूने नियमित अंतरात सहकारी तंबूत परतत असतानाही तेंबाने किल्ला लढवला. चेंडूला असमान उसळी आणि फिरकी मिळत असताना तेंबा चिवटपणे खेळत राहिला. तेंबाने १३६ चेंडूत ५५ धावांची आश्वासक खेळी साकारली. कार्बिन बॉशने २५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. तेंबा-बॉश भागीदारीमुळे भारतीय संघाला मोठं लक्ष्य मिळालं. दक्षिण आफ्रिकेचा डाव १५३ धावांतच आटोपला. रवींद्र जडेजाने ४ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.