टी २० वर्ल्डकपमध्ये सलग दोन पराभवानंतर भारताला विजयी वाट सापडली आहे. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताचे स्कॉटलंड आणि नामिबियासोबत सामने आहे. भारताच्या गटातून पाकिस्ताननं सलग चार सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसऱ्या संघ कोणता याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर अवलंबून आहे. भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत.

अफगाणिस्तानला ६६ धावांनी पराभूत केल्यानंतर आता उर्वरित दोन सामन्यांवर भारताचं लक्ष्य असणार आहे. भारताचा पुढचा सामना स्कॉटलँड आणि नामिबिया संघासोबत आहे. मात्र या दोघांना मोठ्या फरकाने हरवण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहे. इतकंच नाही तर न्यूझीलंड संघाला अफगाणिस्तान आणि नामिबिया या दोन संघांपैकी एकाने पराभूत करायला हवं. तेव्हाच धावगतीच्या जोरावर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. तिसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने हरवल्याने भारताची धावगती धन झाली आहे. भारताची धावगती +०.०७३ झाली आहे.

  • भारताने स्कॉटलँडला १०० हून अधिक धावा, नामिबियाला १०० हून अधिक धावांनी पराभूत केलं पाहीजे
  • अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी अंतराने पराभूत केलं पाहीजे
  • न्यूझीलंडने नामिबियाला जवळपास ५० धावांपेक्षा कमी धावांनी पराभूत केलं पाहीजे.

जुन्या कामगिरीच्या कटू आठवणी बाजूला ठेवत विराटसेनेने आज अफगाणिस्तानची धुलाई केली. अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले. रोहित-राहुलने सलामीला येत १४० धावांची भागीदारी रचली. तर पंड्या-पंत यांनी शेवटच्या २१ चेंडूत तब्बल ६३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्फोटक फटकेबाजी केली, पण भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. २० षटकात अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रोहित सामनावीर ठरला. या विजयासह भारताने आपल्या गुणांचे खाते उघडले आहे.