आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला होता. रोहित शर्माच्या धमाकेदार खेळीनंतर सुद्धा मधल्या फळीतील फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. त्यामुळे श्रीलंकेने भारतावर मात करत फायनलमध्ये धडक मारली. मात्र, यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

त्यात आता ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. मात्र, भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर ३ मोठे बदल करावे लागणार आहे.

केएल राहुलला वगळावं लागेल

भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर, केएल राहुलला प्लेईंग इलेव्हनमधून वगळावं लागणार आहे. केएल राहुलमुळे भारतीय संघ फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आहे. त्यामुळे केएल राहुलला वगळून संजू सॅमसनला सलामवीर म्हणून संधी द्यायला हवी. संजू सॅमसनमध्ये कोणत्याही गोलंदाजाचा सामना करण्याची क्षमता आहे.

पंतला बाहेर ठेवावं लागेल

रोहित शर्माला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवावं लागणार आहे. कारण, ऋषभ पंत ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये खेळण्यासाठी तयार झाला नाही आहे. त्यामुळे ऋषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी देणे योग्य ठरेल. कसोटी आणि आणि एकदिवसीय सामन्यांत ऋषभ पंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पण, ट्वेन्टी-२० सामन्यांत तो दिनेश कार्तिकसारखा प्रभावी खेळाडू म्हणून अद्याप दिसला नाही आहे. दिनेश कार्तिक चांगला फिनीशर, यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. आशिया चषकमध्ये दिनेश कार्तिकला २ सामन्यांमध्ये विश्रांती दिल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

भुवनेश्वर कुमारला विश्रांती द्यावी लागेल

भुवनेश्वर बद्दल बोलायचे झालं तर, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी तो परिपक्व खेळाडू दिसत नाही आहे. चौथ्या फेरीत श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यातील १९ व्या षटकात भुवनेश्वरने १४ धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागलेलं. भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर, भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमीला संधी द्यावी लागणार आहे.