टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे.

अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनचं चार वर्षानंतर टी २० संघात पुनरागमन झालं आहे. अश्विनने यापूर्वी अखेरचा टी २० सामना जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध खेळला होता. ३४ वर्षीय अश्विननं आतापर्यंत भारतासाठी ४६ टी २० सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत. यात ८ धावा देऊन चार गडी बाद केल्याचं त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. दुसरीकडे सुर्यकुमार यादव आणि फिरकीपटू राहुल चाहरला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. सुर्यकुमारने ४ टी २० सामन्यात १६९.५१ सरासरीने १३९ धावा केल्या आहेत. या दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राहुल चाहरने पाच टी २० सामन्यात ७ गडी बाद केले आहेत.

Squad for ICC Men’s T20 World Cup – Virat Kohli, Rohit Sharma, KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Ishan Kishan, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami: BCCI pic.twitter.com/yoSd9SMBlZ

— ANI (@ANI) September 8, 2021

भारतीय संघ
फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
अष्टपैलू खेळाडू- हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा
फिरकीपटू- राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती
यष्टीरक्षक- केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या स्पर्धेस्ठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.