इंदूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध खेळपट्टीवर ठाण मांडून केलेली १८८ धावांची खेळी अजिंक्य रहाणेसाठी विशेष ठरली आहे. अजिंक्यच्या या खेळीसाठी एका मुंबईकराचा सल्ला कामी आला. कसोटीच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणे ७९ धावांवर नाबाद राहिला होता. मात्र, त्यावेळी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी टाकलेल्या चेंडूंनी अजिंक्यची चांगलीच परीक्षा पाहिली होती. यापैकी काही चेंडू त्याच्या बरगडीवर आणि हेल्मेटवरही आदळले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आत्मविश्वासाने सामोरा गेला. यासाठी त्याला मुंबईचा माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचा सल्ला कामी आला. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने नेहमीप्रमाणे प्रवीण अमरे यांना फोन केला होता. त्यावेळी अजिंक्यने खेळपट्टीवर विकेटला डबल पेस असल्यामुळे उसळत्या चेंडूंचा सामना करताना अडचण येत असल्याचे अमरे यांना सांगितले. त्यावर अमरे यांनी अजिंक्यला, तू फक्त उभा रहा, धावा नक्की होतील, असा सल्ला अजिंक्यला दिला. हाच सल्ला दुसऱ्या दिवशी अजिंक्यच्या कामी आल्याचे अमरे यांनी सांगितले. कोलकाता कसोटीत पूलचा फटका मारताना बाद झाल्यामुळे इंदूरमध्ये अजिंक्य पूल शॉट खेळणे जाणीवपूर्वक टाळत होता. भले चेंडू अंगावर आदळला तरी चालेल, पण पूल शॉट खेळायचा नाही, हे अजिंक्यने मनाशी पक्के ठरवले होते. हीच रणनीती अवलंबून तो संयमाने फलंदाजी करत राहिला आणि त्याने १८८ धावांची खेळी साकारली. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही कधी उसळी घेणारे तर कधी खाली बसणारे चेंडू पडत असतानाही अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दर्जेदार फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी रचलेली ३६५ धावांचीभागीदारी ही भारताची सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे २००४ साली चौथ्या विकेटसाठी ३५३ धावा केल्या होत्या. कर्णधार कोहलीच्या द्विशतकानंतर अजिंक्य रहाणेही द्विशतक ठोकतो का याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण अजिंक्य रहाणेचे १२ धावांनी द्विशतक हुकले. रहाणेने १८८ धावांची खेळी केली असून यामध्ये १८ षटकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.