दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) कसोटी मालिका १-२ने गमावल्यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) भारताच्या कसोटी कर्णधारपद सोडले. विराट हा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक ४० कसोटी जिंकल्या. दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीला संघाची कमान देण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ५ वर्षे कसोटीतील सर्वोत्तम संघ होता. इतके यश मिळवूनही कोहलीने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना चकित केले. कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी कोहलीला बीसीसीआयने फेअरवेल मॅच खेळण्याची ऑफर केली होती.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, “जेव्हा विराट कोहलीने बीसीसीआयला फोनवर कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून त्याला कसोटी कप्तान म्हणून बंगळुरूमध्ये फेअरवेल मॅच खेळण्याची ऑफर दिली होती. याला प्रत्युत्तर देताना कोहली म्हणाला, एका सामन्याने काही फरक पडत नाही. मी तसा नाहीये.”

हेही वाचा – विराटनं टेस्ट कॅप्टनशिप सोडली अन् धोनीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

३३ वर्षीय विराट बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध १००वी कसोटी खेळू शकतो. श्रीलंकेचा संघ फेब्रुवारीमध्ये भारतात येत आहे. दोन्ही देशांदरम्यान २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. विराट या कसोटीत खेळला तर त्याची ही १००वी कसोटी असेल.

बीसीसीआय आणि विराटमध्ये वाद..!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, तर बीसीसीआयने त्याची एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध बिघडले होते. टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, असे विराटला सांगितल्याचा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला होता. मात्र बीसीसीआयकडून कर्णधारपद सोडताना कुणीही अडवले नाही. फक्त दीड तास अगोदर एकदिवसीय कर्णधारपदावरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यामुळे कोहली आणि बीसीसीआय यांच्यात वाद रंगला होता.