विराट कोहलीचे (Virat Kohli) बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी एक खुलासा केला आहे. कर्णधार म्हणून सुरुवातीच्या काळात विराट खूप रागावायचा आणि खूप रिअॅक्ट व्हायचा, असे शर्मा यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. याआधी विराट टी-२० आणि वनडे नेतृत्वापासून दूर गेला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी, विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि रोहित शर्माला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, रोहित दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर केएल राहुल वनडे संघाची कमान सांभाळत आहे. वनडे मालिकेपूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत राहुलने कोहलीच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. हेही वाचा - “मी माझा Pull Shot कसा सुधारू?”, चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला रोहितनं दिलं ‘असं’ उत्तर! राहुलच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजकुमार शर्मा म्हणाले, ''कर्णधारपदाच्या सुरुवातीला काळात विराट कोहलीला खूप राग यायचा. जर कोणी झेल सोडला, तर तो रिअॅक्ट व्हायचा. मी त्याला समजावून सांगितले, की प्रत्येकजण त्याच्यासारखा नसतो. क्रिकेटच्या मैदानावर कुणालाही झेल सोडायचे नाहीत किंवा खराब खेळायचे नसते. इतरांनी तुझ्यासारखे व्हावे अशी अपेक्षा करू नकोस. विराटने ते स्वीकारले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्याने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.'' “विराट कोहलीला अहंकार नाही. तसे झाले असते तर त्याने कर्णधारपद सोडले नसते. त्याने रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही पाठिंबा दिला आहे. खरे तर, काही वेळा त्याने वरिष्ठांना सोडून रोहितला खेळवले, कारण तो रोहितला उच्च दर्जाचा खेळाडू मानतो. रोहितने स्वत:ला जागतिक दर्जाचा फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे'', असेही राजकुमार शर्मा म्हणाले.