विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. टीम इंडियाचा कर्णधार हा भारतीय फलंदाजीचा आधार आहे आणि तो एक उत्तम नेताही आहे. विराटने सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. तो आता टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, पण कोहलीच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात संस्मरणीय नव्हती. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या मालिकेत तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ ७६ धावा केल्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले आणि संघात परतल्यानंतरही त्याने आपला बराचसा वेळ पॅव्हेलियनमध्येच घालवला.

विराट कोहलीने अखेरीस त्या वर्षीच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियाचाही दौरा केला. तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता, परंतु तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि उपकर्णधार वीरेंद्र सेहवाग यांच्यामुळे तसे झाले नाही. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सेहवागने २०१६ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.

सेहवागने खुलासा केला, की निवड समितीला विराट कोहलीला वगळायचे होते, परंतु त्याने आणि धोनीने त्याला पाठिंबा दिला. सेहवाग म्हणाला, “निवड समितीला २०१२ मध्ये पर्थमध्ये विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवायचे होते. मी उपकर्णधार होतो आणि महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करत होता आणि आम्ही ठरवले, की विराटला पाठिंबा द्यायचा.”

हेही वाचा – “रोहित-राहुलची जोडी लवकरच…”, गौतम गंभीरनं दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया!

धोनी आणि सेहवागचा हा निर्णय विराटच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला आणि तेव्हापासून त्याला एकदाही संघातून वगळण्यात आलेले नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या आणि त्यानंतर ७५ धावा केल्या. भारताने हा सामना एक डाव आणि ३७ धावांनी गमावला.

विराटपर्वाला सुरुवात…

विराटने चौथ्या कसोटीत शतक झळकावले आणि कसोटी मालिकेत तिहेरी आकडा गाठणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला होता. तिरंगी मालिकेत त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आणि ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७३ धावा केल्या. तिरंगी मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.

पुढच्या वेळी विराटने कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कसोटी कर्णधार बनला. त्याने यशासह संघाचे नेतृत्व करणे सुरूच ठेवले आणि ३८ विजयांसह तो सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने ९६ कसोटींमध्ये ५१.०८ च्या सरासरीने ७७६५ धावा केल्या आहेत. त्याने आता टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपद सोडले आहे.