ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका बरोबरीत रोखल्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि तीच विजयी मालिका आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्येही पुढे ठेवणार आहोत, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पत्रकार परिषदेत सांगितले.
येथे आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने खेळलो असलो तरी येथे झालेल्या पावसामुळे उद्याच्या सामन्याबाबत व्यूहरचना अद्याप ठरविलेली नाही असे सांगून धोनी म्हणाला, सचिन तेंडुलकरने अधिकृतरीत्या निवृत्ती स्वीकारल्यानंतर प्रथमच तो वनडेत दिसणार नाही. त्याची अनुपस्थिती संघास निश्चित जाणवणार असली तरी भविष्यातील संघबांधणीसाठी नवोदित खेळाडूंना संधी देणे आवश्यक होते. ही मालिका युवा खेळाडूंना उपयुक्त ठरणार आहे.
नवीन नियमावलीबाबत मी समाधानी नाही, त्यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम होणार आहे. पन्नास षटके पाच क्षेत्ररक्षक तीस यार्ड्समध्ये ठेवणे म्हणजे गोलंदाजांवर अन्यायकारक आहे, असेही धोनी याने सांगितले.