‘क्या करें क्या ना करें’ अशी स्थिती निर्णय घेताना अनेकदा होते आणि तेव्हा आपली निर्णयक्षमता कसोटीस लागते. बऱ्याचदा निर्णय आपला आपणच घ्यायचा असतो, तर कधी तरी सर्वानुमते घ्यायचा असतो. हा निर्णय व्यक्तिगत स्वरूपाचा असू शकतो, कौटुंबिक असू शकतो किंवा कार्यालयीनही असू शकतो. एखाद्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो.. यामुळे निर्णय घेणाऱ्यावर मोठी जबाबदारी असते आणि त्या निर्णयाचे उत्तरदायित्वही मोठे असते.. योग्य निर्णय कसा घ्यावा, यासंबंधीचे मार्गदर्शन-

निर्णय कसा घ्याल?
* तुमच्यासमोर उपलब्ध असलेले सारे पर्याय लिहून काढा : तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचे नाही. केवळ उपलब्ध पर्यायांची नोंद करा. तुम्हाला जे पर्याय आहेत, असे वाटते त्या सगळ्याची नोंद करा. हे केल्याने तुमचे अंतर्मन मोकळेपणाने नव्या कल्पना सुचवेल.
* उपलब्ध प्रत्येक पर्यायाचा विचार करा : स्वत:ला विचारा की, निर्णय म्हणून मला हा पर्याय पटतो का? त्याचे परिणाम काय होतील, याची कल्पना करा. तुम्ही जशी कल्पना कराल तसेच तंतोतंत घडेल असे नाही. मात्र, त्यामुळे काय होऊ शकेल याची तरी किमान कल्पना तुम्हाला येईल.
* परिणामांची कल्पना करा : या निर्णयाचा इतरांवर कसा परिणाम होईल, याचा विचार करा. यामुळे इतर दुखावले जातील का, त्यांना या निर्णयाची मदत होईल का इत्यादी.
* पर्यायांबाबत तुमच्या भावना तपासा : आयुष्यात आपल्यासमोर असंख्य पर्याय येत असतात. मात्र, त्यातील काहींबाबत विचार करणेही तुम्हाला नकोसे वाटत असेल तर त्यावर फुली मारा. त्यांचा विचार करण्याची गरज नाही. लक्षात असू द्या, हे केवळ तार्किक विश्लेषण नाही, तर केवळ तुमच्या मनात जसे विचार येत आहेत, तसे व्यक्त होणे आहे.
* तुमच्या भावनांचे विश्लेषण करा- तुम्हाला काही पर्यायांचा विचार करणे कम्फर्टेबल वाटेल तर काहींचा विचार करणे नकोसे वाटेल. काही पर्याय उत्तम वाटतील, तर काही चुकीचे वाटतील. आता तुम्ही निवड करत आहात. महत्त्वाचे असे की, लगेचच निष्कर्षांच्या पातळीवर पोहोचू नका, कारण केवळ भावनेच्या पातळीवर घेतलेला निर्णय असेल तर तो चुकीचा असतो. धीर धरा आणि तुमच्या स्वत:च्या भावनांचा गांभीर्याने विचार करा.
* प्राधान्यक्रमांशी उपलब्ध पर्याय पडताळून पाहा. ज्यावर निर्णय घ्यायचा आहे, ते प्रश्न प्राधान्यक्रमांनुसार लिहून काढा. त्या प्रश्नांवर उपलब्ध पर्याय लिहून काढा. जर तुमच्यासमोर सुस्पष्ट प्राधान्यक्रम असतील, तर हे करणे अधिक सोपे बनते. जर तसे नसेल तर तुम्हाला या टप्प्यावर निर्णय घ्यायला अधिक वेळ लागेल.

अचूक निर्णयासाठी..
* परिस्थितीजन्य विचार महत्त्वाचा. हा निर्णय घेण्याची गरज का भासतेय, निर्णय घेतला नाही तर काय होईल, या निर्णयाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कुणावर परिणाम होईल हे सारे विचार महत्त्वाचे ठरतात.

* लाभ-तोटय़ाचा विचार करा – निर्णय घेतल्याने परिस्थितीत जे बदल होतील ते तुमच्यासाठी किती लाभदायक ठरतील आणि किती तोटय़ाचे ठरतील, याचा विचार करा.
* जोखमीचा विचार करा- उपलब्ध पर्यायांनुसार एखादा निर्णय घेताना त्यात किती जोखीम आहे किंवा किती लाभ दडलेले आहेत हेही स्पष्टपणे मांडा.
* योग्य-अयोग्यतेचा विचार करा- अनेकदा चुकीचा निर्णय घेणे सोपे असते. वेगवेगळ्या फायदे लक्षात घेता चुकीचा निर्णय पोषक ठरू शकतो आणि म्हणूनच अनेकदा अचूक निर्णय घेताना तडजोड केली जाते आणि त्याउलट अनेकदा योग्य निर्णय घेतल्याने वाद उफाळून वर येतात, अनेक जण विरोधात जातात. मात्र, निर्णयाला नेहमीच नैतिकतेचा आधार असावा.
* निर्णय हा कायम कामाविषयी तुम्हाला वाटणाऱ्या तळमळीवर आणि कामाविषयीचे उत्तरदायित्व यांवर आधारित असावा.
* पर्यायी योजना हवी- एखादा निर्णय फसला तर काय.. याचा विचार नेहमीच करायला हवा. आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता म्हणून नव्हे, तर भोवतालच्या परिस्थितीत बदल झाला तर कधीकधी आपला निर्णयही चुकू शकतो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या ‘अ’ योजनेसोबत पर्यायी ‘ब’ योजनाही तयार असावी.

निर्णयाचे टप्पे
* कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याआधी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करायला हवे.
* निर्णय घेताना आपल्या नजरेसमोर अंतिम उद्दिष्ट हवे.
* उद्दिष्टानुसार आपल्यासमोरील बाबींचे महत्त्वपूर्ण घटकांमध्ये वर्गीकरण करायला हवे.
* उपलब्ध पर्यायांमधून आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवणारे पर्याय निवडावेत आणि त्यांची छाननी करावी.
* निवडलेल्या पर्यायांच्या चांगल्या-वाईट बाजू लक्षात घेऊन त्यातून अंतिम निर्णय घ्यावा.

निर्णयक्षमता म्हणजे काय?
उपलब्ध पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करणे म्हणजेच निर्णय घेणे. एखादा निर्णय जितका अचूक, योग्य, परिस्थितीचा सारासार विचार करून घेतलेला असतो, तितकी त्या व्यक्तीची निर्णयक्षमता उत्तम असे मानले जाते. समस्येचे विश्लेषण केल्याने समस्येचे स्वरूप स्पष्ट होते आणि मग तो सोडवण्यासाठी उपलब्ध पर्याय समोर येतात आणि त्यातून निर्णय घेणे सुकर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्णय घेतल्यानंतर..
* आपली पसंत दर्शवा- ज्या प्रश्नावर तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, त्या वेळेस निवड करताना तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय वारंवार तुमच्या उत्तरात डोकावत असतो. या टप्प्यावर गोष्टी एकत्रित घडायला सुरुवात होते. तुम्हाला नेमके काय हवे आहे, हे समजायला लागते आणि छान वाटायला लागते. तणाव निवळतो, तुमचा आत्मविश्वास बळकट होतो आणि निर्णय सुस्पष्ट होतो.
* तुमच्या निर्णयाची नोंद करा- इतर पर्याय रद्द करा. या क्षणाला तुम्ही कृती करण्यास तयार आहात. आता मागे फिरू नका. अंतिम निर्णयाच्या दिशेने चालत राहा.. मात्र, जर तुम्ही अजूनही पर्यायांचा विचार करत बसलात, तर मात्र तुम्ही निर्णयाप्रत पोहोचू शकत नाही. जोवर तुम्ही इतर पर्यायांचा विचार मनातून काढून टाकत नाही तोवर तुमचा निर्णय उत्तम ठरणार नाही.
* तुमचा निर्णय योग्य ठरेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहा. इतरही पर्याय योग्य ठरू शकले असते. मात्र, तुम्ही जो निर्णय घेतला आहात त्याच्याशी प्रामाणिक आणि सकारात्मक राहा.