कैरी हा शब्द जरी उच्चारला तरीदेखील अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा सुरु झाला की बाजारात कैऱ्या दिसू लागतात. त्यामुळे घराघरात कैरीचं पन्हं, कैरीची डाळ, लोणचं, मोरांबा,साखरआंबा असे अनेक पदार्थ होऊ लागतात. चवीला आंबट-गोड असलेल्या कैरीमध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. जे फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळे कैरी खाण्याचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊयात. १. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता पसरली असते. त्यामुळे कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो. २. ज्यांच्या शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींनी रोजच्या जेवणात मुरांबा, साखरआंबा या पदार्थांचा समावेश करावा. ३.उन्हाळ्यात सतत घाम येतो. त्यामुळे घामावाटे शरीरातील क्षार निघू जातात आणि थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत कैरी खावी. कैरीमध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांची कमतरता भरुन निघते. ४. उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो. ( नाकातून रक्त येणे) त्यावेळी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं. ५. आजारपणामुळे तोंडाची चव गेल्यास कैरीची लहानशी फोड खावी.