देशात करोना महामारीचा उद्रेक झाल्यामुळे तब्बल दोन महिने लॉकडाउन लागू करावा लागला. यामुळे निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटामुळं अनेक बड्या कंपन्यांनी मोठे निर्णय घेतले. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनकपात तसेच उशीरा पगारवाढ देण्याबातच्या निर्णयांचा समावेश आहे. यामुळे रोजगार आणि कर्मचाऱ्यांबाबत एक निराशेचं वातावरण तयार झालेलं असताना देशात अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी या बिकट परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पावलं उचलली आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, फ्लिपकार्ट, मंत्रा, जॉन्सन अँड जॉन्सन, सीसीएस कॉर्प, एचसीसीबी, भारत पे या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे चांगली पगारवाढ देत त्यांना बढती देखील दिली जाणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयाबाबत तज्ज्ञ म्हणतात की, “या संस्था त्यांच्या व्यावसायिक वास्तविकतेच्या आधारे निर्णय घेत आहेत आणि संकटाच्या काळात कंपन्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये कायमस्वरुपी सद्भावना निर्माण होईल.”

सीएसएस कॉर्पचे सीईओ मनीष टंडन म्हणतात, “सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात कंपन्यांसाठी ही मोठी संधी आहे की, त्यांनी सहानुभूती आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन नेतृत्व करावं. या अनिश्चिततेच्या काळात कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिल्याने कंपनीलाच त्याची मदत होईल आणि निश्चिततेत वाढ होईल, असा आम्हाला विश्वास आहे.” आयटी सेवा क्षेत्रातील या कंपनीने कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखलेली नाही. उलट त्यांच्या ७,००० कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारवाढ दिली. कंपनीचे निम्न स्तरावरील (लोअर बँड) कर्मचारी जे कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी ७० टक्के आहेत. त्यांच्या पगारात तर १०० टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ या कंपनीने दिली आहे. टाइम्स नाउ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

“संकटाच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल कायम उंचावत ठेवणं आणि त्यांना सुरक्षित वाटेल अशी भावना निर्माण करणं हे आपलं काम आहे,” असं बीएसएच होम अप्लायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक नीरज बहल यांनी म्हटलं आहे. या कंपनीनं मार्केटिंग आणि प्रवास खर्चात कपात केली असून नवी नोकर भरती थांबवली आहे. मात्र, सर्वात आधी आपल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना बढती आणि पगारवाढ दिली आहे.

इन्फ्लेक्शन पॉईंट व्हेंचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय बन्सल यांचं म्हणणे आहे की, “कंपनीने कर्मचार्‍यांच्या वेतन कपात व निवृत्ती विरोधात निर्णय घेतला. कारण, मार्चपासून मॅक्रो ट्रेंड कमकुवत दिसत होता आणि आम्हाला विश्वास आहे की, आमचे कर्मचारी कंपनीसाठी चांगल्या गोष्टी घडवून आणतील.”

तर उलटपक्षी अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या जसे टाटा कन्सलटन्सी (टीसीएस), विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगारवाढ पुढे ढकलली. रिलायन्स इंडस्ट्रिज, टीव्हीएस मोटर्स आणि ओयो रुम्स या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली. तर ओला, उबर, झोमॅटो, स्विगी आणि आयबीएम या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.