सरकारी भागीदारी असलेल्या BSNL ने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली असून कंपनीकडून ग्राहकांना एक महत्त्वाची सुविधा दिली जाणार आहे. मागच्या काही वर्षात इंटरनेटचा वापर वाढल्याने इंटरनेटशी निगडित जास्तीत जास्त चांगल्या सेवा देऊन ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत आता BSNL ही मागे नाही. रिलायन्स जिओमुळे टेलिकॉम बाजारात जोरदार खळबळ सुरु असताना आता आपणही ग्राहकांना ४ जी सेवा देत असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कंपनीने याबाबतची घोषणा केली. या सुविधेची सुरुवात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यापासून करण्यात आली असून याठिकाणच्या BSNL ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा इतर शहरातही लागू करण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे. मागील आठवड्यात त्रिपुरा आणि ईशान्य भारतातील अन्य दोन राज्यात BSNL ने ही सुविधा लागू केली होती. मात्र महाराष्ट्रात ती आता लागू झाली आहे. याआधी BSNL च्या ग्राहकांना ३ जी सेवेच्या माध्यमातून २ ते ३ एमबी इतकी स्पीड मिळत होता. त्यामुळे स्पीडच्या बाबतीत कंपनी काहीशी मागे पडत होती. मात्र आता कंपनी इतर कंपन्यांसोबत स्पर्धा करु शकणार आहे. सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४ जी सेवेसाठी १५७ टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी ११५ टॉवर सुरु आहेत. उर्वरित टॉवर येत्या काही दिवसातच सुरु होणार आहेत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.