डॉ. अरुणा टिळक - arunatilak@gmail.com घरकाम करणाऱ्या महिलांचे स्थान आपल्या घरात नेहमीच महत्त्वाचे आहे. सकाळपासून दुपापर्यंत त्यांचे काम सतत पाण्यात होत असते. भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे हे करताना त्यांना खाली बसून किंवा वाकून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना नेहमीच कंबरदुखी होते. पाय दुखणे किंवा पाय वळणे होते. जेवणाच्या वेळा न पाळल्याने किंवा खाण्यात शिळेपाके सतत असल्यामुळे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यांचे हात सतत पाण्यात असतात. त्यामुळे त्यांच्या नखांना वारंवार जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे त्यांनी पिकलेल्या लिंबामध्ये अंगठा दहा मिनिटे ठेवणे म्हणजे दोन दिवसांत बरे वाटते. तसेच लिंबाचा जेवणात वापर जरूर ठेवावा. कंबरदुखी, पाय दुखणे अशा वात व्याधींसाठी लसणीचा वापर आहारात जरूर करावा. पण तो एवढाही जास्ती नसावा की त्यामुळे परत अॅसिडिटीचा त्रास होईल. ती ज्या ठिकाणी काम करते, त्या ठिकाणी जर जेवणाची वेळ पाळणे शक्य झाले तर ती पाळण्याचा प्रयत्न करावा. जेवणात आंबट दही, लोणचे या अॅसिडिटी व सांधेदुखी वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. जेवणामध्ये चपाती, नाचणीची भाकरी जरूर खावी. नाचणीमध्ये आयर्न, कॅल्शियमच्या पुरेसा साठा असतो, ज्याचा तिला सांधेदुखीमध्ये नक्कीच फायदा होतो. पूर्वी या महिला विडय़ाचे पान, चुना खात असतं पण आजसुद्धा जर किंचित चुना आणि ओवा, थोडे सुके खोबरे घालून पान खाल्ले तर कॅल्शियमचा योग्य पुरवठा होतो. मात्र या ठिकाणी तंबाखूचा वापर मात्र प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. कंबरदुखी टाळण्यासाठी तिळाच्या तेलाचा किंवा शेंगदाणा तेलाचा वापर आहारात करावा. तिळाचे तेल थोडे गरम करून पायाला कमरेला जरूर लावावे. त्यांच्या पायाला जळवात चिखल्या होतात. अशा वेळी मेंदीची ओली पाने वाटून त्याचा एक चमचा रस साखरेबरोबर घ्यावा. ती वाटलेली मेंदी तळपायाला लावली तर अशा बा व अभ्यंतर प्रयोगाने लवकर बरे वाटते. अंगावर ओले कपडे राहिल्याने त्यांना वाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी चहामध्ये आले, एखादी लवंग किंवा मिरी घालून घेतली तर त्यांना नक्कीच फायदा होतो.