आजकाल तपासणी साठी मुलांनी आपल्या पालकांना आणण्यापेक्षा, पालकांनी आपल्या तरुण मुलांना चेकअप साठी आणण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्यक्षात भारतात ह्रदय रोग्यांची संख्या तर मोठी आहेच पण ती जगात सर्वाधिक आहे. पुर्वी रुग्णाचे वय बघुनच काही रोगांची शक्यता नाकारता येत होती. आर्थरायटीस, डायबिटीस, बीपी हे रोग कमी वयोगटामध्ये क्वचितच दिसत असत. पण आज तरुण ह्रदयविकाराना बळी पडतोय. यामागची कारणे जाणून घेणं आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे.

  • धुम्रपान – तंबाखु, बिडी, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे आजचे तरुण ह्रदयविकार ओढावून घेत आहेत. नैराश्य असो अथवा जस्ट फन म्हणून केलेलं व्यसन असो, तरुणांमध्ये याचं प्रमाण वाढत चाललंय. सिगारेटमुळे कोरोनरी आर्टरिज मध्ये क्लॉट्स किंवा ब्लॉकेज होण्याचे प्रमाण वाढते.
  • आनुवंशिकआजार – जर आई वडिलांना वय वर्षे ५० च्या आत ह्रदयविकाराचा झटका किंवा ह्रदय कमकुवत होण्यासारखी लक्षणे असतील तर तरुण मुलांमध्ये ह्रदय विकार आनुवंशिकतेने येण्याची शक्यता जास्त असते. गुणसूत्रे(जीन्स) आपल्या शरीरातील संपुर्ण कार्डियोवस्क्युलर सिस्टीम सांभाळतात, वाहिन्यांतून जाणाऱ्या रक्तप्रवाहापासून ते हार्ट पंपींगपर्यंत बऱ्याच गोष्टी गुणसुत्रांवर वर अवलंबून असतात. त्यामुळे ज्यांच्या घरी अशी परिस्थिती आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
  • खाण्याच्या सवयी – तुमचं ह्रदय कसं वागतं हे तुम्ही काय खाता यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. रोज फास्टफूड खाण्यापेक्षा आठवड्यातून एक दिवस एवढेच प्रमाण योग्य आहे.
  • मोबाईल वेड – मोबाइल वरचे गेम्स आणि विविध सोशल मिडीया साईट्स मुळे एकाच जागी तासनतास बसून राहण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. हालचाल न करता फार वेळ बसून राहण्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचते आणि ब्लॉकेजेस सारखे धोके उत्पन्न होतात. व्यायामचा संपूर्ण अभाव फक्त ह्रदयविकारच नाही तर अनेक आजारांना आमंत्रण देतो. कोणत्याही प्रकारचा व्यायाम; धावणे, मैदानी खेळ खेळणे, सायकलींग, नृत्य, झुंबा जो प्रकार तुम्हाला आवडेल तो करु शकता, ज्याने तुमचे ह्रदयच नाही तर मन ही ताजेतवाने राहील.
  • मानसिक ताण – नैराश्य, अपेक्षांचे ओझे आणि योगसाधना किंवा मेडिटेशनच्या अभावामुळे ह्रदयावरील ताण वाढत जातो. मानसिक ताण न घेता आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची गरज आहे. या सर्व कारणां मुळे, युवकांनी दरवर्षी ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर ची चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ अनिल पोतदार, ह्रदयरोगतज्ज्ञ