आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत सध्या वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असून विविध विकारांची उपचार पद्धती, औषध पद्धती यांच्यात आमूलाग्र संशोधन होत आहे. मात्र पारंपरिक उपचार पद्धतीही तितकीच महत्त्वाची असून विविध विकारांवर मात करण्यात ती उपयुक्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विविध आजारांवर गुणकारी उपचार पद्धतीसाठी पारंपरिक भारतीय औषधे आणि नवी आधुनिक औषधे यांच्या एकीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आयुष विभागचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी जयपूर येथे नुकत्याच झालेल्या बाल आरोग्य परिसंवादात त्यांनी पारंपरिक व आधुनिक औषधांविषयी भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयाने चांगल्या परिणामांसाठी यापूर्वीच अॅलिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांच्या एकीकरणाचा प्रस्ताव आखला असून पारंपरिक भारतीय औषधांचे आधुनिक औषधांमध्ये एकीकरण होणे गरजेचे आहे. भारत हा जगभरात आयुष प्रणालीतील औषधांसाठी सर्वश्रुत असून योगा आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा, सोवा, रिगापा आणि होमिओपॅथी यांचाही त्यात समावेश आहे. औषधांमधील या प्रणालीचे एकीकरणाचा सकारात्मक वापर हा आरोग्यमय जीवनशैलीच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मत नाईक यांनी जयपूरच्या एनआयएमएस विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केले. या वेळी परिसंवादात सहभागी झालेल्या अमेरिकेतील हरलॅन्ड विन्टर आणि ब्रिटनचे अनिल धवन या तज्ज्ञांनीही आपली मते मांडली. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)