काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओनं अन्य कंपन्यांच्या नंबरवर मोफत कॉलिंगची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीनं ग्राहकांना एक झटका दिला आहे. कंपनीनं टॅरिफ प्रोटेक्शन सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आपल्या प्लॅनमध्ये बदल केल्यानंतरही ग्राहकांना काही कालावधीपर्यंत जुने प्लॅन मिळू शकणार होते. परंतु आता ग्राहकांना नव्या प्लॅननुसार रिचार्ज करावं लागणार आहे.

रिलायन्स जिओनं ६ डिसेंबर रोजी नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा केली होती. रिलायन्स जिओचे नवा प्लॅन १२९ रूपयांपासून तर अन्य कंपन्यांचे प्लॅन १४९ रूपयांपासून सुरू होत आहेत. जे ग्राहक कोणत्याही अॅक्टिव्ह प्लॅनशी जोडले गेलेले नाहीत किंवा ज्यांच्या मोबाईल क्रमांकावर कोणताही प्लॅन अॅक्टिव्हेट नाही अशा ग्राहकांसाठी कंपनीनं टॅरिफ प्रोटेक्शन प्लॅनची सेवा सुरू केली होती. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार आता नॉन अॅक्टिव्ह जिओ ग्राहकांसाठी ही सेवा बंद करण्यात आली आहे.
सर्व युझर्सना करावं लागणार रिचार्ज

हा प्लॅन बंद केल्यानंतर आता सर्व ग्राहकांना कंपनीच्या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या नव्या प्रीपेड प्लॅनची सुरूवात ९८ रूपयांपासून होते. तर कॉलिंग मिनिटांसोबत येणाऱ्या नव्या प्लॅनची सुरूवात १२९ रूपयांपासून होते. सध्या कंपनीकडून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिटाचा दर आकारला जातो. तर अन्य कंपन्या अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देत आहेत.